पिंपरी – पिंपरी-चिंचवड, मावळ तालुक्यासह अनेक भागांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्के पाणी साठा कमी आहे. यंदाच्या कडक उन्हाळ्याने धरणातील 397 मिलिमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. बुधवार (दि. 18 मे)अखेर धरणात 30.9 टक्के इतका पाणीसाठा असून गतवर्षी याच दिवशी 36.14 टक्के इतका पाणीसाठा होता. हा पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल. मात्र, पावसाने ओढ दिल्यास पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून केले जात आहे.
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर, हिंजवडी आयटी पार्क, वाघोली परिसर आणि शेतकऱ्यांसाठी दररोज पाणी सोडले जाते. गतवर्षी धरण परिसरात 2 हजार 722 मिमी इतका पाऊस झाला होता. सप्टेंबर महिन्यामध्येच पवना धरण 100 टक्के भरले होते. मात्र, यावर्षी गेल्या अनेक वर्षांपेक्षा जास्त कडक उन्हाळा जाणवत आहे. पुणे जिल्ह्यातील विविध भागाचा पारा 42 च्या पुढे गेला होता. साधारण फेब्रुवारीच्या मध्यानंतर कडक उन्हाळा सुरू होतो. धरणातीलही पाणी साठ्याचे बाष्पीभवन होण्यास सुरूवात होत असते. तर मार्च आणि एप्रिलमध्ये उन्हाचा कडाका अधिकच वाढल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला होता. 1 फेब्रुवारी ते 15 मे पर्यंत पवना धरणातील 397 मिलीमीटर पाणी साठ्याचे बाष्पीभवन झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 26 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत वाढ होत असते. आजही शहरातील विविध भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहेत. मोठ-मोठ्या सोसायट्यांना टॅंकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. महापालिकेच्या वतीने पालिकेच्या नळ कनेक्शनला मोटार लावणाऱ्यांवर आणि अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
पवना धरणात सध्यस्थितीत 30.9 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षींपेक्षा 6 टक्के पाणीसाठा कमी आहे. 397 मिमी म्हणजे सुमारे दिड फुट पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. उष्णतेची लाट, पाण्याचा वापर वाढल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास अडचण होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. जूनअखेरपर्यंत पाणीसाठा पुरेल.
– समीर मोरे, शाखा अभियंता, पवना धरण