सत्र न्यायालयाने सुनावली होती ही शिक्षा
पुणे – कुत्रे भुंकल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून खून केल्याप्रकरणात पुणे येथील सत्र न्यायालयाने सात जणांना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 22 वर्षानंतर रद्द केली. सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. या अपिलाची सुनावणी न्यायाधीश एस. एस. शिंदे आणि नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर झाली. पोलिसांनी सदर केलेला पुरावा हा पुरेसा नाही. आरोपीची ओळखपरेड न घेणे, साक्षीदारांच्या जबाबात असलेल्या विसंगती आणि तपासातील त्रुटी बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. आरोपीचा बचाव मान्य करून, न्यायालयाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत हा आदेश केला.
बारकू चंदर जगताप (वय 34), श्रीकांत खंडू माकर (वय 41), दत्तू सावळा भालेराव (वय 59), श्रीरंग दत्तू भालेराव (वय 29), निवृत्ती संतू यादव (वय 59), लहू दत्तू भालेराव (वय 26) आणि गेणभाऊ लक्ष्मण साठे (वय 32, सर्व रा. खुळे मुळशी) अशी त्या सात जणांची नावे आहेत. त्यांनी ऍड. दीपक गिरमे, ऍड. नितीन देशपांडे आणि ऍड. सिद्दार्थ चपळगावकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपील केले होते.
1993 साली बिरा कासकर आणि त्याचे नातेवाईक हे आपल्या कुटुंबासह खुळे येथे मुक्कामास आले होते. घटनेच्या दिवशी बारकू जगताप हा रस्त्याने जात असताना त्याच्या अंगावर कुत्रे भुंकले. त्यामुळे त्याने कुत्र्याला लाथ मारली आणि कासकर यांच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी जगतान याने परिसरातील लोकांना घेऊन येतो, अशी धमकी कासकर कुटुंबीयांनी दिली. त्यानंतर जगताप हा इतर आरोपींनी घेऊन आला. सर्वांची मिळून बिरा, त्यांच्या नातेवाइकांना बेदम मारहाण केली. त्यात बिरा यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता