नगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या स्राव नमुन्यांपैकी 7 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ते करोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले. अजून 6 जणांचा नमुना अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत 42 जणांची तपासणी जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आली असून त्यापैकी 37 जणांना त्यांची नमुना चाचणी निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आले.
मात्र त्यांच्यावर घरी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आज आणखी 14 जणांचे स्राव नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. परदेशातून परत आलेल्या व्यक्तींची केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी केली जात आहे. इतर कोणत्याही रुग्णालयात नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी करुन घ्यावी. याबाबत कोणत्याही अफवा अथवा खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करेल, असे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हा एकवटला असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई, पुण्यासारख्या महानगरातील प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने केलेल्या सकारात्मक प्रयत्नांना जिल्हावासियांनीही प्रतिसाद दिल्याने हा धोका आपण टाळू शकतो, असा विश्वास द्विवेदी यांनी व्यक्त केला.
द्विवेदी यांनी आज जिल्हा रुग्णालयात जाऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. करोना प्रादुर्भाव उपाययोजनांसंदर्भात त्यांनी चर्चा करुन संबंधितांना सूचना दिल्या.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, माहितीची अधिकृत स्रोतांकडून खात्री पटल्याशिवाय अपूर्ण, अर्धवट, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका. असे प्रकार करणाऱ्याविरोधात जिल्हा पोलीस दलाचा सायबर पोलीस विभाग कार्यवाही करेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरिया, दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरु झाली आहे. परदेशातून परत आलेल्या नागरिकांनी स्वतःहून त्यांची आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालयात करून घ्यावी, तसेच या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना त्रास जाणवत असेल, तर त्यांनीही आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ज्या ज्या व्यक्तींना त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्या व्यक्तींच्या हातावर “होम क्वारंटाईन’ असा शिक्का मारण्यात आला आहे. या व्यक्तींना 14 दिवस कोणाच्या संपर्कात राहण्यास मनाई करण्यात आली आहे.