वृत्तसंस्था – करोना महामारीच्या संकटाने देशात हाहाकार माजवला असून कोरोनाने अनेकांना फारच वाईट दिवस दाखवले आहेत. कुटुंबातील कर्तीसवरती माणसे डोळय़ादेखत निघून जात आहेत. तर माता-पिता, भाऊ-बहीण असे सामुदायिक मृत्यू होत असल्याने हसत्या-खेळत्या कुटुंबांवर स्मशानकळा येताना दिसून येत आहेत. उत्तर प्रदेशातल्या लखनौजवळच्या इमलिया गावात अशीच हृदयाचे ठोके वाढविणारी घटना समोर आली आहे. करोनाच्या कचाट्यात सापडून एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे.
२० दिवसांच्या कालावधीमध्ये ओमकार यादव यांच्या परिवारातल्या सात जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा जणांना करोनाची लागण झाली होती तर एकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचाही मृत्यू झाला. या घटनेने येथील परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला असून एका गावात एवढे मृत्यू होत आहेत याबद्दल चौकशी व्हायला हवी. मात्र, गावात साधी स्वच्छतेची सुविधाही उपलब्ध करुन दिलेली नाही. अशी माहिती गावचे प्रमुख मेवाराम यांनी दिली आहे. तसेच मृत व्यक्तींना योग्य उपचार मिळाले नाहीत, त्यांना ऑक्सिजनयुक्त बेड्स मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे. या गावात ५९ करोना रुग्ण मिळाले मात्र त्यांना प्रशासनाकडून कोणतीच उपचार पद्धती देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना स्वत:च त्यांची काळजी घ्यावी लागत आहे.
हे ही वाचा
केमिकल टँकर आणि ट्रकची समोरासमोर टक्कर, भीषण आग लागून 2 जणांचा होरपळून मृत्यू
करोनाची तिसरी लाट! लहान मुलांना ‘फ्लू’ची लस देणे का महत्वाचे आहे?; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
सावधान! ‘या’ देशात आता तिसऱ्या लाटेची सुरुवात; भारतीय वंशाच्या संशोधकाचा इशारा