अंतिम दहा स्थानांसाठी जिल्ह्यात चुरस वाढली
सातारा – “ओपन डीफिकेशन फ्री’ (ओडीएफ) म्हणजे हागणदारीमुक्त होण्यावर न थांबता जिल्ह्यातील सात नगरपालिकांनी त्यापुढे यश मिळवून “ओडीएफ प्लस प्लस’ हा दर्जा मिळवला आहे. यामध्ये सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, कराड, वाई, मलकापूर, रहिमतपूर येथील पालिकांचा समावेश असून अंतिम दहा पालिकांमध्ये स्थान मिळविण्यासाठी जिल्ह्यातील पालिकांमध्ये चुरस वाढली आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने सोमवारी हे मानांकन जाहीर केले.
“ओडीएफ प्लस प्लस’मध्ये देशभरात केवळ 472 शहरांनी यश मिळवले आहे. यात छत्तीसगडच्या खालोखाल महाराष्ट्रातील 113 शहरे “ओडीएफ प्लस प्लस’ बनली आहेत. त्यामुळे देशात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे. “क्लालिटी कंट्रोल ऑफ इंडिया’ समितीच्या निकषांचे काटेकोर पालन करत सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांनी “ओडीएफ’ दर्जा मिळवला होता. त्यानंतर स्वच्छता मोहीम सुरू ठेवताना एक एक टप्पा पार पाडण्यासाठी नगरपालिकांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. स्वच्छतागृहांची उभारणी, दैनंदिन साफसफाई, उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणाऱ्यांना प्रतिबंध, आदी बाबींची पूर्तता करून “ओडीएफ प्लस’चा टप्पा नगरपालिकांनी पार केला.
त्यानंतर “ओडीएफ प्लस प्लस’ मानांकन मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. केवळ शौचालय बांधून स्वच्छता मोहीम थांबत नाही, याची जाणीव ठेवत सर्व पालिकांनी स्वच्छतागृहे अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम सर्व स्वच्छतागृहांना पाणी, विजेची सोय उपलब्ध करून दिली. दिव्यांगांसाठी स्वच्छतागृहांच्या पायऱ्यांशेजारी रॅम्प बांधले.
स्वच्छतागृहांमध्ये दिव्यांगांसाठी कमोड बांधले. त्याबरोबर वॉश बेसिन, हॅंडवॉश, आरसे बसवण्यात आले. हे करतानाच शौचालय परिसरात स्वच्छता राखण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. साताऱ्यात 18 “बेस्ट टॉयलेट’ आणि सात “मॉडेल टॉयलेट’ बांधण्यात आली आहेत. यात नागरिकांसाठी व्हेंडिंग मशीन, फीडबॅक मशीन, केअरटेकर उपलब्ध करण्यात आले आहेत.
“ओडीएफ प्लस प्लस’साठी कराड व पाचगणी पालिकांमध्ये प्रचंड चुरस आहे. गतवर्षी या दोन्ही पालिका अंतिम 15 मध्ये होत्या. प्रशासकीय व राजकीय सत्ताकेंद्रे हातात हात घालून सक्रिय राहिल्याचे अपेक्षित परिणाम दिसून आले. साताऱ्यातही ओडीएफ प्लससाठी जोरदार हालचाली झाल्या. 18 मॉडेल टॉयलेट बांधण्यात आली. मात्र, रॅम्प चुकीचे बांधण्यात आल्याने गुणांकन घसरण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष कामापेक्षा निधी जिरवण्यात पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवकांनी धन्यता मानली. आता स्पर्धा निकालाच्या टप्प्यात असताना अंतिम दहा मध्ये कोणती पालिका बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.