राजभवनामध्ये नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकसह महाराष्ट्रातील खासदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रीपदे आणि तीन राज्यमंत्रीपदे देण्यात आली आहेत.
यामध्ये एक शिवसेनेच्या वाटेला एकमेव केंद्रीय मंत्रीपद आले आहे. तर अकोल्यातील भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना प्रथमच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी मोदी सरकारमध्ये दहा मराठी चेहऱ्यांना मंत्रीपद देण्यात आले होते.
दरम्यान, पुढील सहा महिन्यांत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्याधर्तीवर मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मंत्रीपदे मिळतील अशी आशा होती. मात्र, 2014च्या तुलतेन महाराष्ट्राला कमी मंत्रीपदे देण्यात आली आहेत.
गेल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला भूपृष्ठ वहन, जहाजबांधणी, संरक्षण (राज्यमंत्री), रेल्वे, मनुष्यबळ विकास, नागरी हवाई उड्डाण, सामाजिक न्याय (राज्यमंत्री) अशी महत्त्वाची खाती आली होती. आता गडकरींसह चार खासदारांनी केंद्रीय मंत्रीमंडळाची शपथ घेतली आहे. तर दानवेंसह तीन खासदारांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दिग्गजांच्या पराभवामुळे अरविंद सावंत आणि संजय धोत्रे यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. परंतु या दोन्ही खासदारांना कोणते मंत्रीपद मिळते याची उत्सुकता सर्वांनाच आहे.