भुवनेश्वर – माओवाद्यांनी ओडिशाच्या मलकनगिरी भागात पेरून ठेवलेले सात आयईडी बॉम्ब सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधून काढून ते निकामी केले आहेत.
ओडिशा-आंध्र प्रदेश सीमाभागात त्यांनी हे बॉम्ब पेरून ठेवले होते. तेथून ये-जा करणाऱ्या सुरक्षा पथकांवर हल्ला करण्याचा माओवाद्यांचा इरादा होता.
सोमवारी रात्री ही बाब बीएसएफच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तेथे बॉम्बनाशक पथके पाचारण केली. त्या पथकांनी आज मंगळवारी हे बॉम्ब निकामी केल्याने मोठी प्राणहानी टळली.
त्या परिसरात स्वाभिमान आंचल नावाचा जो भाग आहे तो ओडिशाच्या मुख्य भूमीला जोडून त्या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास करण्याचे काम तेथील सरकारने सुरू केले आहे. त्या विकासकामांना विरोध करण्यासाठीच माओवाद्यांकडून हा घातपाताचा डाव रचण्यात आला होता.