पुणे : शैक्षणिक वर्ष सन 2014-15 ते 2016-17 या कालावधीत विद्यार्थी संख्येमुळे कमी झालेली शिक्षकांची पदे आता विद्यार्थी संख्या असल्यास मंजूर करता येणार आहेत. यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना सेवा संरक्षण मिळणार आहे.
विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदांबाबतची संचमान्यता मंजूर करुन घेणे शाळांना बंधनकारक आहे. विद्यार्थी संख्या कमी झालेली असल्यास शिक्षकांची पदे कमी होतात. उपलब्ध शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात येते. विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळांना पूर्वीचीच मंजूर पदे व विद्यार्थी संख्या कमी झालेली पदे विद्यार्थी संख्येनुसार असल्यास सन 2013-14 मधील मंजूर पदांच्या मर्यादेत सन 2019-20 मध्ये मंजूर करण्याऐवजी संच मान्यता सन 2018-19 च्या स्थितीच्या अनुषंगाने मंजूर करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
संबंधित शाळांमध्ये पद देय होत असेल आणि विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षक अतिरिक्त ठरले असेल तर अशा शिक्षकांना संच मान्यतेत पद मंजूर झाल्यापासून सेवेत पूर्ववत करुन घ्यावे, असे आदेश शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांना दिले आहेत.
शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील यांनी शिक्षकांची पदे मंजूर करण्याबाबत निवेदने सादर करुन शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत शासनाने सकारात्कम कार्यवाही सुरू केली आहे.