नगर – तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची थेट जाहिरात करणे हा कायद्याने गुन्हा असला तरी, उत्पादन कंपन्यांमार्फत जिल्ह्यातील पान टपऱ्यांवर या उत्पादनांची थेट जाहिरात करीत आहेत. कोटपा कायद्यानुसार, थेट कंपन्यांवर कारवाई अपेक्षित आहे; मात्र संबंधित विभागाकडून याप्रकरणी कुठलीच कारवाई होत नाही.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येते; मात्र दुसरीकडे तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांची सार्वजनिक ठिकाणी थेट जाहिरात केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोटपा कायद्यांतर्गत उत्पादक कंपन्यांनी तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाहिरात करणे अपेक्षित आहे; मात्र असे न करता उत्पादक कंपन्या सार्वजनिक ठिकाणी थेट तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनाची जाहिरात करताना दिसतात. हा प्रकार कायद्याने गुन्हा असला तरी, त्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही, हे वास्तव आहे.