पुणे – फूल–फळांच्या पुनर्निर्मितीसाठी परागीभवन (Pollination) प्रक्रिया महत्त्वाची ठरते. अनेकदा मधमाशी, फुलपाखरांसारख्या कीटकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया घडते. पण, परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण झालीच नाही तर? हा प्रश्न जितका गंभीर आहे, तितकेच याबाबतच्या संशोधनाचे निष्कर्षही गंभीर आहेत. हवा प्रदूषणामुळे नैसर्गिक पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे.
मानवी आरोग्य, अर्थकारणावर धोकादायक परिणाम करणारे हवेचे प्रदूषण इतरही जीवसृष्टीसाठी हानीकारक ठरत आहे. प्रदूषणाचे मधमाशी, फुलपाखरांसारख्या कीटकांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत. या कीटकांच्या शरीरात हवेतील हानिकारक घटक आढळून येत आहे. यामध्ये शिसे, आर्सेनिक, टंगस्टन आणि इतर काही घातक द्रव्ये यांचा समावेश आहे. या घटकांना एकत्रितपणे “आरएसपीएम‘ म्हणजेच श्वसनासाठी योग्य नसलेली घटके असे म्हणतात. या घटकांच्या जास्त काळ संपर्कात आल्यास सजीवांच्या शवसन संस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे विविध संशोधनातून समोर आले आहे.
नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिक सायन्स (एनसीबीएस) या संस्थेने नुकतेच एक संशोधन प्रकाशित केले आहे. या संशोधनानुसार, हवेतील प्रदूषणामुळे मधमाशीच्या शरीरावर गंभीर परिणाम होत आहे. परिणामी अधिक काळ प्रदूषित हवेच्या संपर्कात राहिलेल्या मधमाश्या परागीभवन प्रक्रियेसाठी असमर्थ ठरत असल्याचा निष्कर्ष या संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी संस्थेतील गीता जी. थिम्मेगोवडा, डॉ. एक्सेल ब्रॉकमन, डॉ. दंडापन्ने पेरुन्डेराई या संशोधकांच्या टीमने चार वर्षे संशोधन केले आहे. यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील 1,800 मधमाशांवर संशोधन करण्यात आले.
अभ्यासातील काही धक्कादायक बाबी :
- प्रदूषित भागांमधील मधमाशांचे आयुर्मान अत्यल्प
- मधमाशांच्या शरीरात हवेतील हानीकारक घटकांचा साठा
- हवा प्रदूषणाचा प्रजातीनिहाय परिणाम नाही
- प्रदूषित भागांमधील मधमाशांचे हृदयाची गती, शरीरातील रक्तकोशिका, रोगप्रतिकारक शक्ती यामध्ये लक्षणीय बदल
- परागीभवनातील अडथळ्यांमुळे कृषिक्षेत्रावर गंभीर परिणामांची शक्यता
हवा प्रदूषणाचे जीवसृष्टीवर होणाऱ्या परिणामांबाबत आपल्याकडील अभ्यासकांना अद्याप फारशी माहिती नाही. “एनसीबीएस’च्या संशोधनामुळे ही महत्त्वाची बाब समोर येण्यास मोठी मदत झाली आहे. या परिणामांची गंभीरता लक्षात घेता, हवेच्या गुणवत्तेबाबत अधिक गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य ती पावले उचलावी लागतील.’
– डॉ. हेमा सोमनाथन, मधुमक्षिका अभ्यासक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ऍन्ड रिसर्च.