मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीची गंभीर दखल संसदीय समितीने घेतली आहे. खार पोलीस ठाण्यात आपल्याला चुकीची वागणूक दिल्याचा आरोप राणांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
त्यांच्या याच आरोपांवर आता दिल्लीत चौकशी करण्यात येणार आहे. संसदीय समितीने महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांना 15 जूनला दिल्लीत हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आल्यानंतर खार पोलीस ठाण्यात पोलिसांकडून जी वागणूक दिली गेली होती त्याबद्दल त्यांनी संसदीय समितीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल अखेर संसदीय समितीकडून घेण्यात आली आहे.
संसदीय समितीने चार अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि भायखळा कारागृहाचे अधिक्षक यशवंत भानुदास यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांची आता दिल्लीत चौकशी होणार आहे.