बेलग्रेड: काश्मीर मुद्द्यावरून सर्बिया या देशाने भारताला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की सुरूच राहिली आहे.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर सध्या सर्बियाच्या दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यावेळी त्यांनी त्या देशाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. त्या भेटींमध्ये काश्मीरसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यावेळी काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याची भूमिका सर्बियाने घेतली. त्यातून काश्मीर मुद्द्यावरून सर्बिया ठामपणे भारताच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट झाले.
भारताने ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा खटाटोप त्या देशाकडून केला जात आहे. त्यातून प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतविरोधी कांगावा करण्याचे सत्र पाकिस्तानने आरंभले आहे.
मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तानला कुठला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. काश्मीर मुद्दा ही आमची अंतर्गत बाब असल्याची ठाम आणि रास्त भूमिका भारताने घेतली आहे. भारताच्या त्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक पाठिंबा मिळत आहे. सर्बियाच्या कृतीमुळे ती बाब पुन्हा अधोरेखित झाली.