नवी दिल्ली: समुद्रमार्गे होणारा करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशातल्या सर्व 12 प्रमुख बंदरांना जहाज मार्गे येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि निदान करण्याचे, तसच संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. “डायमंड प्रिन्सेस’ या प्रवासी जहाजावरच्या अनेक भारतीय कर्मचारी आणि प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून जपानमध्ये विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यापैकी कुणालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीत निष्पन्न झालेले नाही अशी माहिती,परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी टोकियो मधल्या भारतीय दूतावासाच्याअ हवाल्याने ट्विटरवरून दिली आहे.
चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 636 जणांचा मृत्यू झाला असून, 31 हजार 161 लोकांना याची लागण झाली आहे, असे ते म्हणाले. देशात केरळमध्ये कोरोना विषाणूचे तीन रुग्ण आढळले आहेत. ते चीनमधल्या वुहान इथून आले होते. त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. देशभरात कुठेही नवा करोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही, असे केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी सांगितले आहे.
जपानी नागरिकांना घेऊन जपानचं चौथं विमान टोकियो इथं परतले
चीनमधल्या वुहान इथून 198 जपानी नागरिकांना घेऊन जपानचे चौथे विमान टोकियो इथे परतले आहे. आतापर्यंत कोणामध्येही करोना विषाणूची लक्षणे आढळलेली नाहीत आणि या सर्वांना टोकियो इथल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यापूर्वी त्यांची सखोल तपासणी केली जाईल, असे जपानचे मुख्य मंत्रिमंडळ सचिव योशिहिदे सुगा यांनी वार्ताहरांना सांगितले. चीन खालोखाल जपानमध्ये करोनाबाधित 86 रुग्ण असून, त्यापैकी 41 रुग्ण “डायमंड प्रिन्सेस’ या एका क्रूझ जहाजावर आहेत.