औरंगाबाद : एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट असतानाच औरंगाबादेत ‘सारी’ (सिव्हिअरली ऍक्यूट रेस्पिरेटरी इलनेस) रोगाचे ढग गडद होताना दिसत आहे. सारी आजाराने औरंगाबादेत आतापर्यंत १४ जणांचे बळी घेतले आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. सारी आजाराचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी औरंगाबादमध्ये स्वतंत्र रुग्णालय सुरु करण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी हा निर्णय जाहीर केल्याचे औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
दरम्यान, औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. आतापर्यंत औरंगाबादेत २४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग, आणि पालिकेचे अधिकारी सतर्क झाले आहेत. ज्या विभागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तो परिसर सील करण्यात आला आहे.
तर, परिसरातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे सारी आजाराने हातपाय पसरवण्यास सुरवात केली आहे. औरंगाबादमध्ये कोरोना बाधितांपेक्षा सारी आरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सारी आजाराची आणि कोरोना विषाणूचे लक्षणे सारखेच असल्याने नेमका कोणता आजार आहे, हे लवकर स्पष्ट होत नाही.