बारमेर – राजस्थानातील बारमेर येथील सभेच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा अधिकृत अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. या सभेत मोदींनी लष्करी दलांचा आपल्या राजकीय लाभासाठी वापर करून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार कॉंग्रेसने त्यांच्या विरोधात दाखल केल्यानंतर आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्या विषयीचा अहवाल मागवला होता.
पंतप्रधानांवर प्रचार बंदीचा आदेश लागू करावा अशी मागणी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे 22 एप्रिलला केल्यानंतर आयोगांने त्यांच्या भाषणाविषयी स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यास आता सुरूवात केली आहे. भारताने आपल्याकडील अणुबॉंब दिवाळीसाठीच राखून ठेवले आहेत काय असा प्रश्न उपस्थित करून मोदींनी पाकिस्तानवर अण्विक हल्ला करण्याचा इशाराही याच सभेत दिला होता.