नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी एक लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर गुरूवारी मुंबई शेअर बाजार 1,411 अंकांनी वधारला.
मुंबई शेअर बाजार 1,410.99 अंकांनी वधारून 29,946.77 अंकावर स्थिारावला. या सत्रात 1,564 अंकांनी वाढ झाली. त्याच वेळी निफ्टी 323.60 अंशांनी वधारला. तो 8,641.45 अंकांवर स्थिरावला. या सत्रात इंड्सइंड बॅंकने सर्वात जास्त भाव खाल्ला. त्या पाठोपाठ भारती एअर टेल, एल अँड टी, बजाज फायनानन्स, कोटक महिंद्रा, बजाज ऍटो, एचयुएल आणि एचडीएफसी 10 टक्क्यांनी वधारला. तर मारूती सुझुकी, टेक महिंद्रा, सन फार्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर काहीसे गडगडले.
दरम्यान भारतीय रुपयाची किंमत डॉलर्सच्या तुलनेत 57 पैशांनी वाढल्याने डॉलर्सचा दर 75.37 रुपये झाला. क्रुड ऑईलचे दरही 2.15 टक्क्यांनी घट झाली. ते 26.80 डॉलर्स प्रती बॅरेलवर जाऊन पोहोचला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज ग्रामीण आणि शहरी भागातील गरीबांसाठी जाहीर केले. ही मदत त्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्यात येईल. त्याच बरोबर देशभर पसरत असलेल्या कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 50 लाखांचा विमा उतरवण्याची घोषणाही त्यांनी केली. या योजनेचा लाभ कोट्यवधी गरीबांना होईल. तर विमा योजनेचा लाभ आरोग्य क्षेत्राय कार्यरत डॉक्टर्स, नर्स आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना होईल. त्याची संख्या सुमारे 20 लाख असेल.
80 कोटी गरीबांसाठी पुढील तीन महिने एक किलो डाळ आणि पाच किलो गहु/तांदूळ देण्यात येणार आहे. मनरेगाच्या मजुरीत 182 रुपयांवरून 202 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, गरीब विधवा, गरीब आणि वृध्द दिव्यांग यांना पुढील तीन महिन्यात दोन हप्त्यात एक हजार रुपयांचे विशेष सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. स्वयंसहायता गटास एकत्रित मोफत 20 लाखांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्मचारी आणि संस्थेद्वारा भरला जाणारा भविष्य निर्वाह निधी पुढील तीन महिने सरकारद्वारा भरला जाणार; 100 पेक्षा कर्मचारी असणाऱ्या आणि 90 टक्के कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयांपेक्षा पगार कमी असणाऱ्या सर्व संस्थांना हा लाभ मिळेल. आठ कोटी 30 लाख दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिकाधारक आणि उज्ज्वला योजनेच्या लाभधारकांना पुढील तीन महिने मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.