मुंबई : मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपा नेते नरोत्तम मिश्रा यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता नसरुद्दीन शाह आणि गीतकार जावेद अख्तर हे तुकडे-तुकडे गँगचे एजंट असल्याचा गंभीर आरोप केला केला आहे. फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये असणाऱ्या मुद्द्यांवर या तिघांकडून भाष्य केले जात असल्याची टीका नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“शबाना आझमी, नसरुद्दीन शाह आणि जावेद अख्तर हे स्लीपर सेल असणाऱ्या तुकडे-तुकडे गँगचे एंजट असून, फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये घडणाऱ्या घटनांवर वाद निर्माण करतात,” असा नरोत्तम मिश्रा यांचा आरोप आहे. ते म्हणाले “राजस्थानमध्ये कन्हैय्यालालची हत्या झाली किंवा झारखंडमध्ये महिलेला जिवंत जाळलं यावर शबाना आझमी काही भाष्य करत नाहीत”. “तुकडे-तुकडे गँग किंवा अवॉर्ड वापसी गँगला हे अजिबात दिसत नाही. यावरुन त्यांची वाईट विचारसरणी उघड होत आहे. कोणीही त्यांना सुसंस्कृत किंवा धर्मनिरपेक्ष कसं काय म्हणू शकतं?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.
शबाना आझमी यांनी नुकतंच बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींची सुटका करण्याच्या निर्णयाविरोधात महिला संघटना आणि विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. बिल्किस बानो प्रकरणी आरोपींची १५ वर्षानंतर कारागृहातून निर्दोष सुटका झाल्यानंतर शबाना आझमी यांनी जोरदार टीका केली आहे. “माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. मला प्रचंड लाज वाटत आहे. याशिवाय माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही,” असे शबाना आझमी यांनी एका इंगेआजी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते.