अहमदाबाद – गुजरातमधील कवयित्री पारूल खाखर यांनी गंगेत वाहिलेल्या प्रेतांच्या संबंधात एक कविता लिहून केंद्र सरकारच्या करोना हाताळणीच्या व्यवस्थेवर अत्यंत चपलख टीका केली आहे. त्यांच्या या कवितेने चांगलीच खळबळ माजवली असून या कवितेवर गुजरात साहित्य अकादमीचे अध्यक्ष विष्णू पांड्या यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
या कवयित्रीचा उल्लेख त्यांनी साहित्यिक नक्षल असा केला असून या उदारमतवाद्यांना देशात फक्त अराजक माजवायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
गुजरातच्या साहित्यिक वर्तुळात या कवितेवरून मोठीच वावटळ उडाली आहे. अनेक गुजराती साहित्यिक व लेखकांनी कवयित्री खाखर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या लेखकांनी साहित्य अकादमीच्या अध्यक्षांवर टीकाही केली आहे.
पारूल खाखर यांच्या या वादग्रस्त ठरलेल्या कवितेचे नाव शववाहिनी गंगा असे आहे. ही कविता अत्यंत लोकप्रिय झाली असून तिची अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. सोशल मीडियातही ती मोठ्या प्रमाणात चालवली जात आहे.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष पांड्या यांनी अकादमीच्या शब्दसृष्टी नावाच्या एका नियतकालिकात लेख लिहून या कवितेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की ही कविता असू शकत नाही, काव्यासाठी जी मोकळीक आहे त्याचा गैरफायदा घेऊन समाजात अराजक माजवण्याचा हा प्रयत्न आहे असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्र विरोधी शक्तींनी या कवितेचा गैरवापर चालवला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर शंभर गुजरातमधील लेखकांनी आक्षेप घेऊन कवयित्रीला तसेच या कवितेला त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. साहित्य अकादमीच्या प्रमुखांनी एका कवयित्रीचा आवाज दाबण्याचा प्रकार केला असून त्याचा आम्ही निषेध करतो असे गुजराती लेखक मंडळाचे मनिष जानी यांनी म्हटले आहे.