युती तुटल्यास राष्ट्रवादीचे इच्छुक शिवसेनेत?
शहरातील कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील काही इच्छुक युतीच्या आयत्यावेळच्या तुटीकडे लक्ष लावून बसले आहेत. युती तुटल्यास पिंपरी आणि भोसरीतील राष्ट्रवादीचे प्रमुख दोन दावेदार शिवसेनेचा ध्वज खांद्यावर घेण्याची शक्यता आहे.
…तर बसू शकतो फटका
यावेळी दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्यास मात्र चित्र वेगळे असण्याची शक्यता आहे. सत्ताविरोधी कौल, महापालिकेतील भ्रष्टाचार आणि युतीमधील इच्छुकांची मोठी संख्या यामुळे बंडखोरी आणि अंतर्गत कलहाचा फटका युतीला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पिंपरी – शिवसेना व भाजपातील राज्यपातळीवरील नेते आणि मंत्री युतीबाबत वेगवेगळी वक्तव्ये करू लागल्याने शहरातील सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी सावध पवित्रा घेतला आहे. संजय राऊत, तानाजी सावंत, सुभाष देशमुख आणि आता अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे युतीवर तुटीचे सावट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना आणि भाजपाचा गेल्या पाच वर्षांत “तुझे माझे जमेना-तुझ्या वाचून करमेना’ असाच काहीसा कारभार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील एकसंधता वगळल्यास गेल्या पाच वर्षांत आरोप-प्रत्यारोप आणि एकत्र सरकार असाच प्रकार दिसून आला. मात्र लोकसभेला झालेल्या महायुतीनंतर विधानसभेलाही ही युती कायम राहिल, अशी ठाम वक्तव्ये शिवसेना भाजपातील नेतृत्त्वाने जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत केली होती. जागावाटप निम्मे -निम्मे झाल्याचेही सांगून टाकले होते. केवळ मुख्यमंत्री पदाबाबत दोन्ही पक्षातून एकवाक्यता दिसून येत नव्हती. मात्र युतीबाबत सर्वच नेते ठाम बोलत होते.
अचानकपणे गेल्या महिनाभरात शिवसेना आणि भाजपामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवातील आमदार व नेत्यांचे “इनकमिंग’ वाढल्याने स्वबळाच्या भाषेला सुरुवात झाली. जागावाटप निश्चित झाले असले तरी मतदारसंघाबाबत अनिश्चितता असल्यामुळे कोणता मतदारसंघ कोणाकडे यावरून दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये धुसफूस सुरू झाली. आदित्य ठाकरे यांच्या जनआर्शीवाद यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “लाटेमध्ये कोणी जिंकला म्हणून ती जागा त्यांची होईल या भ्रमात कोणी राहू नये’ असे वक्तव्य केल्याने चर्चेला सुरुवात झाली.
मतदारसंघाचा फॉर्म्युला मागीलप्रमाणेच राहिल, असेही सांगून टाकल्याने ज्या शिवसेनेच्या जागेवर भाजपाचे आमदार निवडून आले त्या ठिकाणची अनिश्चितता वाढली. त्यातच शिवसेनेचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी भोसरीतील कार्यक्रमात स्वबळाची भाषा केली. त्यापाठोपाठ चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही 288 मतदारसंघात कामाला सुरुवात करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. राज्य पातळीवरील नेत्यांच्या वक्तव्यानंतर आता थेट या वादात अमित शहा यांनी उडी घेत शिवसेनेला जागावाटपाचा कोणताही शब्द दिला नसल्याचे जाहीर केल्यामुळे युतीमधील अस्वस्थता वाढली आहे.
जुन्या जागांचा फॉर्म्युला, जागावाटप आणि उमेदवारी या प्रकारामुळे शहर पातळीवरील इच्छुकांची घालमेल मात्र वाढली आहे. जुन्या जागा वाटपात चिंचवड आणि भोसरी शिवसेनेकडे होते तर पिंपरी भाजपाकडे. सध्या पिंपरीत शिवसेनेचा चिंचवडमध्ये भाजपाचा तर भोसरीत अपक्ष मात्र भाजपा सहयोगी आमदार आहेत. शहरातील तीनही मतदारसंघात शिवसेना, भाजपा इच्छुकांची संख्या मोठी आहे. तर रिपाईने पिंपरीवर दावा सांगितला आहे. इच्छुकांची मोठी संख्या त्यातच आयाराम-निष्ठावंत वाद आणि युतीवर तुटीचे निर्माण झालेले संकट यामुळे सर्वांनी सावध पवित्रा घेतला आहे.