अमरावती – मेळघाट व्याघ्र प्रकरल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक (CCF) श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित करण्यात आले आहे. याआधी याप्रकरणी मुख्य आरोपी उपवन संरक्षक (DFO) विनोद शिवकुमार याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेड्डींच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्यांनी विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासाचा उल्लेख केला होता. ती नोट त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना उद्देशुन लिहिली होती. त्यामुळे रेड्डी यांच्या निलंबन व अटकेची मागणी करण्यात येत होती. भाजपनेही रेड्डींच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती.
आज मंगळवारी (ता. 30) भाजपने अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करून रेड्डी यांच्या निलंबनाची व अटकेची मागणी केली. यावेळी अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून रेड्डींच्या अटकेची व निलंबनाची मागणी केली. त्यानंतर दुपारी श्रीनिवास रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले आहे.
शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
दरम्यान, दीपाली चव्हाण यांच्या आईने आरोपी शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. विनोद शिवकुमार याचं निलंबन करुन त्याला अटक करण्यात आली आहे. श्रीनिवास रेड्डी यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा दीपाली चव्हाण यांच्यावर मोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.