संगमनेर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे वृद्धापकाळाने सोमवारी मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. त्यांचा अत्यंविधी संध्याकाळी ४ वाजता संगमनेर अमरधाम येथे प्रवरातिरी होणार आहे.
संगमनेरचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांचा गांधीजींच्या ‘चले जाव’ चळवळीत सहभाग होता. १९६२ ते ८० अशा चार विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी संगमनेर मतदारसंघातून जिंकल्या. २० वर्षे ते आमदार होते. या काळात ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण व बॅरिस्टर ए. आर. अंतुले या पाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात सहकार, नियोजन, महसूल, कायदा व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आदी खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला आहे. वयाच्या ६१व्या वर्षी १९८०मध्ये त्यांनी शेवटची निवडणूक लढवून ती जिंकली व १९८५पासून राजकारणातून निवृत्ती घेतली.