मुंबई : राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाचा आता राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली आहे. विशेष म्हणजे गरज पडल्यास राज्यामध्ये लष्कराची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केल्याचे समजते. एका खासगी संकेतस्थळाने यासंदर्भातली माहिती दिली आहे.
करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज असून आजच करोनाविरोधातील मोहिमेला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ नाव दिले आहे. असे असतानाच आता राज्य सरकारने केंद्राकडे गरज पडल्यास लष्कर पाठावावे अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, इटली, स्पेन आणि फ्रान्समधील काही भागांमध्ये स्थानिक पोलिसांबरोबरच लष्कराच्या जवानांना नियुक्त करण्यात आलं आहे. करोनाचा धोका असल्याने देशातील सरकारने जारी केलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीदरम्यान कोणाही सार्वजनिक ठिकाणी भटकू नये यासंदर्भातील खबरदारी घेण्याची जबाबदारी काही देशांमध्ये लष्करावर टाकण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने केंद्राकडे ही मागणी केली असल्याचे बोलले जात आहे.