नवी दिल्ली – दिल्लीत आयटीबीपी या निमलष्करी दलांची व लष्कराची वैद्यकीय मदत पथके पाठवली जावीत, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून केली आहे.
दक्षिण दिल्लीत करोना रुग्णांसाठी दहा हजार खाटांची सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले आहे तेथील मदतीसाठी या पथकांची जरूरी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. इतक्या मोठ्या केंद्रात रूग्णांवर उपचार करण्यासाठीचे वैद्यकीय मनुष्य बळ दिल्ली सरकारकडे नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
राधास्वामी सत्संग बीस या संस्थेच्या प्रांगणात हे दहा हजार रुग्णांवर उपचाराची सोय असलेले केंद्र उभारण्यात आले आहे. त्यात प्रत्येकी 50 रुग्णांची सोय असलेले 200 कक्ष उभारण्यात आले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या या रुग्णालयात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. या जून महिन्याच्या अखेरीपर्यंत हे केंद्र कार्यान्वित होणार आहे.