नागपूर : राज्यातील सत्तासंघर्षात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे उडी घेतली असल्याचे दिसत आहे. कारण राज्यातील गोंधळामध्ये भागवत यांनी सेना आणि भाजपला मोलाचा सल्ला दिला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकामध्ये जिव्हाळा जपून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा सल्ला दिला आहे. भागवत संघाचे स्वयंसेवक विलास फडणवीस यांच्या सहाव्या स्मृतीदिना निमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
राज्यात विधानसभेचा निकाल युतीच्या बाजूने लागला असला तरी भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असणारा मुख्यमंत्रीपदाचा वाद सत्ता स्थापणेतील अडथळा ठरत आहे. त्यातच दोन्ही पक्ष आपापल्या मतांवर ठाम असल्याने राज्यातील सत्ता स्थापणेचा तिढा सुटत नाही. याच पार्श्वभूमीवर संघप्रमुख डॉ.मोहन भागवत यांनी प्रत्येकवेळी जिव्हाळ्याचा प्रतिसाद जिव्हाळ्यानेच मिळेल असे नाही कधी तो तिरस्काराने पण मिळू शकतो. परंतू, त्यातही आपसातील जिव्हाळा आटू न देण्याची ताकद माणसांमध्ये असावी लागते, असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी दोन्ही पक्षाना अप्रत्यपणे सल्ला दिला आहे. माणसांवर प्रेम करणे ही तपश्चर्या आहे, मात्र त्यासाठी खुप समजूदारी लागते, एकमेकांना समजून घ्यावे लागते असेही भागवत यांनी म्हटले.
उत्तम स्वयंसेवक कोण या प्रश्नाचे उत्तर देताना, संघाचा उत्तम कार्यकर्ता तोच जो माणसाची कदर करतो, माणसांमध्ये राहून माणसे जोडतो असे संघचालक म्हणाले. तसेच संघ कशासाठी सुरू आहे याची कारणमिमांसादेखील यावेळी भागवत यांनी केली. संघ ध्येयनिष्ठेसाठी आहे मात्र ही ध्येय निष्ठा आत्मीयतेशी जोडली गेली आहे. तसेच संघाचा मुळ आत्मीयता आहे. माणसं जोडणं आणि त्यांच्याशी आत्मीयता ठेवणे हीच संघाची शिकवण असल्याचेही सांगत सत्तेसाठी भांडणाऱ्या सेना आणि भाजपचा अप्रत्यक्षपणे समाचार घेतला.