यवत -दौंड व पुरंदर तालुक्यांना जोडणारा भुलेश्वर घाट हा अलीकडे झालेल्या पावसामुळे हिरवाईने नटला असून, या घाटाने येणारे जाणारे वाहनचालक तरुण घाटात थांबून घाटाच्या विहंगम वातावरणाची मजा लुटत आहेत. मात्र, काही अतिउत्साही तरुण या घाटात असलेल्या कठड्यावर उभे राहून सेल्फी काढण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे घाटात दुर्घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या तरुणांना रोखण्याची गरज आहे.
सध्या पावसाळी वातावरण असल्याने भुलेश्वर घाट हिरवाईने नटला आहे. येथून जाणाऱ्या वाहनचालक प्रवाशांना हा घाट मोहिनी घालत आहे. त्यातच श्रावण महिना सुरू असल्याने भुलेश्वर मंदिरात दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येत आहेत. भुलेश्वर मंदिर हे या घाटालगत आहे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक आणि उत्साही तरुण घाटात थांबत असून जीवाची पर्वा न करता येथील कठड्यावर आणि धोकादायक खोल दरीजवळ सेल्फी काढत आहेत.