नवी दिल्ली- “आत्मनिर्भर भारत’ हा निर्धार अंतर्मुख होण्यासाठी नसून देशाची क्षमता वाढवण्यासाठी आणि जागतिक शांततेसाठी तसेच जागतिक अर्थकारण अधिक स्थिर करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. संरक्षण उद्योगाच्या एका परिसंवादामध्ये पंतप्रधान बोलत होते. संरक्षण क्षमतांमध्ये भारताने स्वयंपूर्ण होण्याने हिंदी महासागर क्षेत्रामध्ये सुरक्षा प्रदान करण्यास प्रोत्साहनच मिळेल आणि त्यामुळे भारत संरक्षण संबंधांच्या आधारे अनेक मित्र देशांसाठी सुरक्षा पुरवठादार बनेल, असेही पंतप्रधान म्हणाले.
संरक्षणाशी संबंधित अनेक उपकरणांच्या आयातीवरचे निर्बंध केवळ आयात कमी करण्यासाठी नसून देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी घातले गेले आहेत. आणखी काही उपकरणांवर आगामी काळात आयात निर्बंध घातले जातील, असेही पंतप्रधान म्हणाले.
भारत दीर्घकाळपासून जगातील सर्वात मोठा संरक्षण आयात करणारा देश आहे. देशाला स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी समर्थ वातावरणाचा वारसा लाभला असतानाही देशांतर्गत संरक्षण उत्पादनाकडे पुरेसे लक्ष दिले गेले नव्हते. मात्र, आता केंद्र सरकारच्या दृष्टिकोनातून आता देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी आणि खासगीक्षेत्राच्या वाढीव सहभागाने नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारने संरक्षण उत्पादनामध्ये 74 टक्के थेट परदेशी गुंतवणूक खुली केली आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
अनेक राज्यांमध्ये कामगार क्षेत्रात सुधारणा होत असून या सुधारणांची प्रक्रिया आता थांबणार नाही. उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये संरक्षण कोरिडॉर उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. आगामी 5 वर्षांच्या कालावधीत यासाठी 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक उपलब्ध करून दिली जाईल. केंद्र सरकारने नेहमीच लाल फितीचा कारभार हटवण्यासाठी आणि खासगी उद्योगांचे स्वागत करण्याचे काम केले आहे. हे धोरण सर्वांसाठी समान समाधानाची “विन-विन’ स्थिती असणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.