नवी दिल्ली – भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी 101 संरक्षण उत्पादनांची आयात थांबविण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी निर्णयाचे उद्योग जगताने स्वागत केले आहे.
या संरक्षण साहित्याची देशातून खरेदी करण्यासाठी 52 हजार कोटी रुपये वेगळे ठेवले जाणार आहेत. यामुळे देशातील उद्योगांना संरक्षण साहित्य क्षेत्रात उमेदीने काम करता येईल, असे भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी सांगितले. भारतामध्ये या क्षेत्रात काम करण्याची तांत्रिक क्षमता आहे. सरकारने देशातील उद्योगावर दाखविलेला विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू असे फिक्की या उद्योजकांच्या संघटनेचे संरक्षण समितीचे अध्यक्ष एस. पी. शुक्ला यांनी सांगितले.
भारत संरक्षण साहित्याची खरेदी करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. मात्र, यातील बहुतांशी भाग आयात केला जातो. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे यातील बहुतांश भाग देशातच तयार केला जाणार आहे.
संरक्षण उपकरण उत्पादन क्षेत्रात आगोदरच कार्यरत असलेल्या भारत फोर्ज कंपनीचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांनी सांगितले की, या निर्णयामुळे भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होईल आणि रोजगारनिर्मिती वाढेल. यामुळे या क्षेत्रात अगोदरच सक्रिय असलेल्या कंपन्या अधिक उत्पादन घेण्यासाठी कामाला लागतील, असे त्यांनी सांगितले.