सातारा – सध्याच्या राज्य सरकारमध्ये शिंदे गटाच्यावतीने कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार दीपक केसरकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथील शासकीय विश्रामगृहामध्ये भेट घेतली. यावेळी सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत आपली सत्ता का गेली याचे आत्मचिंतन व्हावे, असा टोला महाविकास आघाडीला लगावला. आता शिवसेना माझीच आहे असं म्हणायचं का, असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाठीभेटी झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, “साताऱ्याने महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी प्रयत्न केले. विशेष मागास प्रवर्गांतर्गत देण्यात आलेले आरक्षण आणि त्या अनुषंगाने मिळालेल्या शासकीय संधी आरक्षित करण्यामध्ये सुद्धा त्यांनी कोणतेही प्रयत्न कमी पडू दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी जे प्रयत्न केले त्याचे राजकारण व्हायला नको.’
मुख्यमंत्री असताना त्यांनी विविध विकास प्रश्न तडफेने मार्गी लावले, अशा शब्दांत उदयनराजे यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. काही लोकांनी आपली सत्ता का गेली, याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाला वाटत असतं की सत्तेत राहावं. मात्र, सत्ता टिकवण्यासाठी लोकांचाही आवाज ऐकणे गरजेचे असते. त्यामुळे लोकांनी आता शिंदे गट आणि भाजप युती स्वीकारली आहे. काही गोष्टी वेळ आल्यावर समोर येतीलच. मात्र, संबंधितांनी आत्मचिंतन करावे असा माझा सल्ला आहे. शिवसेना माझी आहे असं म्हणायचं का, असा उपरोधक प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरे गटाला विचारला आहे.
केसरकर यांनी घेतली राजमातांची भेट
एखाद्या गोष्टीसाठी सर्व एका विचाराने एकत्र आले तर ती ताकद नैसर्गिक असते. आता यापुढे सत्तेच्या माध्यमातून विकास कामे नैसर्गिक पद्धतीने होतील. त्यासाठी वेगळी शक्ती वापरण्याची गरज पडणार नाही, असेही उदयनराजे यांनी सांगितले. खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीनंतर दीपक केसरकर यांनी साताऱ्यातील जलमंदिरात राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेतली. ही भेट अनौपचारिक असल्याचे यावेळी केसरकर यांच्यावतीने सांगण्यात आले. सायंकाळी पावणेसहा वाजता केसरकर यांनी जलमंदिरात येऊन कल्पनाराजे भोसले यांच्याशी अनौपचारिक संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.