नरेंद्र मोदी; साताऱ्याला भारतातील सर्वोत्तम 15 पर्यटनस्थळांपैकी एक बनविण्यासाठी सर्व प्रयत्न करणार
सातारा – उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यापूर्वी कधी जेवढ्या विक्रमी मतांनी तुम्ही निवडून दिले होते, त्यापेक्षाही अधिक विक्रमी मतांनी दोन्ही राजांना निवडून द्या, असे आवाहन पंचप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. क्रातीकारक व पुरोगामी चळवळींची परंपरा असणाऱ्या सातारा जिल्ह्यात रोजगारनिर्मितीची गुणवत्ता व पर्यटनवाढीसाठी निसर्गाची प्रचंड अनुकूलता आहे. साताऱ्याला भारतातील सर्वोत्तम 15 पर्यटनस्थळांपैकी एक बनविण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने विकासाच्या योजना केवळ राजकारणातून रखडविल्या अशी टीका मोदी यांनी केली.
सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत श्री. मोदी यांनी बोलत होते. उदयनराजे भोसले यांनी मोदी यांना सातारी पगडी, चांदीच्या शिवमुद्रेची प्रतिकृती, भवानी तलवारीची प्रतिकृती भेट दिली. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी चांदीचे कमळ देऊन त्यांचे स्वागत केले. शिवेंद्रसिंहराजे व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी 370 कमळांचा हार आणि तलवार मोदींना भेट दिली. यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार मदन भोसले, अतुल भोसले, जयकुमार गोरे,
धैर्यशील कदम, शंभूराज देसाई, महेश शिंदे व दिगंबर आगवणे तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शेखर चरेगावकर, भरत पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर आदी प्रमुख उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “”साताऱ्याच्या भूमीत मी यापूर्वीही अनेकदा आल्याने येथील सत्काराशी माझा परिचय आहे. तुम्हा सर्वांचा उत्साह आणि जोश पाहून विरोधकांचा “होश’ उडून गेला आहे. सातारा ही संतांची, क्रांतिकारकांची, समाजाला दिशा देणाऱ्या अतुलनीय सामाजिक, अध्यात्मिक नेतृत्वाची भूमी आहे. वीर संभाजी, समर्थ रामदास स्वामी, रामशास्त्री प्रभुणे, श्री. छ. प्रतापसिंह महाराज, सावित्रीबाई फुले, क्रांतिसिंह नाना पाटील अशी रत्ने या भूमीने देशाला दिली. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे द्रष्टे नेतेही याच भूमीने दिले.
सातारा ही माझी गुरूभूमी आहे. आज मी जे काही करत आहे, ज्या संस्कारांमध्ये मी वाढलो, ते संस्कार देणारे गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार यांचे गाव याच जिल्ह्यातील खटाव हे आहे. त्यांचे शिक्षण येथेच झाले. त्यानंतर ते गुजरातमध्ये आल्यावर त्यांच्याकडून शिक्षण आणि समाजकार्याची दीक्षा मिळाली. यामुळेच साताऱ्याची भेट मला तीर्थयात्रेसारखी वाटते. गौरवपूर्ण इतिहासाचे स्मरण करताना रोमांचकारी अनुभव येथे येतो. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा केशरी ध्वज फडकवत येणारे छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत, असे वाटते.” आजपर्यंत भाजपकडे शिवाजी महाराजांचे संस्कार होते, आता आमच्याकडे त्यांचा पूर्ण परिवार आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आणि हिंदुस्थान निर्माण करण्याची ताकद आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
महायुतीने गेल्या पाच वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांप्रमाणेच काम केले. राष्ट्रभक्ती व राष्ट्रवाद यांना प्राधान्य दिले. भारतभूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले, असा दावा करून मोदी म्हणाले, “”छत्रपती शिवरायांनीही राष्ट्ररक्षणाला प्राधान्य देत सशक्त सेना उभारली, त्याचप्रमाणे गेल्या पाच वर्षांत तिन्ही संरक्षण दले जगातील अनेक देशांप्रमाणे सशक्त करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.
संरक्षण दले आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहेत. देशरक्षणासाठी असे निर्णय घेण्याची क्षमता व हिंमत पूर्वीच्या सरकारांकडे नव्हती; परंतु आम्ही देशरक्षणासाठी जी पावले उचलली, त्यांना विरोधक विरोध करत आहेत, हे दुर्दैवी आहे. साताऱ्याच्या भूमीने अनेक शूरवीर दिले आहेत. अपशिंगे मिलिटरी हे गाव तर देशरक्षणासाठीच समर्पित गाव आहे. हे गाव घराघरांतून देशरक्षक देत आहे. त्यामुळे देशाच्या विरोधात कोणी बोलले तर साताऱ्याची भूमी ते सहन करणार नाही.
जेव्हा विरोधक आपल्या वीर जवानांच्या विरोधात बोलतात, तेव्हा त्याचे सर्वाधिक दु:ख या भूमीला होते. राफेलबाबत अपप्रचार केल्यावर राष्ट्रभक्तांना आत्यंतिक वेदना होतात. 370 कलम रद्द करण्याचा निर्णय झाल्यावर अफवा पसरवल्या जातात, तेव्हा सातारा पेटून उठतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी होते, तेव्हा साताकरांमध्ये संतापाची लाट उसळते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनभावना समजत नाही. त्याची शिक्षा पूर्ण देशाने लोकसभा निवडणुकीत त्यांना दिली आहे. आता महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत हीच जनता त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देणार आहे.”
कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या राजकारणाचा आधार “फोडा, फोडा, फोडा आणि मलई खा’, असा आहे, अशी टीका करून मोदी म्हणाले, “”हे संस्कार छत्रपती शिवरायांचे नाहीत. छत्रपतींच्या विचारांवर आम्ही चालत आहोत. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा आमचा मूलमंत्र आहे. केंद्र व राज्य सरकारने हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्राला दिले आहेत. कराड- गुहागर चौपदरी रस्ता, सातारा- कागल सहापदरी महामार्गाचे काम सुरू आहे. विकासाच्या नावावर त्यांनी कसे राजकारण केले, ते तुम्ही ओळखून आहात.
पाण्याचाच विषय घ्या, 1995 ला युती सरकार आले, तेव्हा या भागासाठी धरणांचे प्रस्ताव मंजूर केले. मात्र, त्यांचे सरकार आल्यावर फायली दाबून ठेवण्यात आल्या. 2014 मध्ये देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र यांना संधी मिळाली आणि या फायली पुन्हा उघडण्यात आल्या. निधी देऊन सिंचन प्रकल्पांची कामे गतीने सुरू झाली. माझे गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सुरू असलेली जिहे-कठापूर ही योजना त्याचाच भाग आहे.”
शेतकरी, युवक, सैन्यदलांमधील जवान अशा प्रत्येक घटकासाठी हे सरकार काम करत आहे. प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी मिळेल, अशा पद्धतीने काम सुरू आहे. मराठा आरक्षण व इतर आरक्षणांच्या बाबतीत महायुतीने केवळ गप्पा न मारता करून दाखवले आहे. कोणाचेही शोषण होणार नाही, कोणाचेही हक्क हिरावून घेतले जाणार नाहीत. महिला सबलीकरण, अल्पसंख्याकांचा सन्मान वाढेल, अशी पावले उचलत आहोत. धार्मिक सलोख्याची आमची नीती देशाला मान्य आहे.
फक्त आपला आशीर्वाद हवा आहे, असे आवाहन त्यांनी केले. साताऱ्याचा इतिहास गौरवशाली आहे. अध्यात्मिक वारशाबरोबर निसर्गाचे वरदानही लाभले आहे. सर्वांत चांगली फुले असलेले कास पठार, सर्वात उंच वजराई धबधबा या जिल्ह्यात आहे. येथे पर्यटन विकासाला आणि व्यवसायांना वाव आहे. त्यामुळे येथे दळणवळणाच्या अत्युच्च दर्जाच्या सुविधा दिल्या जातील. जगभरातील पर्यटक येथे येतील आणि जगातील 15 सर्वोत्तम पर्यटनस्थळांमध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश असेल. त्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
इतर उमेदवारांच्या अनुल्लेखाची जोरदार चर्चा
उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करताना पंतप्रधान मोदी यांनी महायुतीच्या इतर उमेदवारांचे नाव घेऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले नाही, ही बाब अनेकांना खटकली. व्यासपीठावर शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह इतर सात मतदारसंघांतील महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. भाषण संपवून जाताना सर्व उमेदवारांबरोबर हातात हात मिळवून उभे राहत फोटोसाठी मात्र त्यांनी पोझ दिली. सात मतदारसंघांतील उमेदवारांचा उल्लेख टाळल्याची राजकीय गोटात जोरदार चर्चा होती.
लोकसभा लढण्याची हिंमत दोन्ही कॉंग्रेसमध्ये नव्हती
विरोधकांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. सातारा हा आपला अभेद्य किल्ला आहे, असे म्हणणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला येथे लोकसभा निवडणूक लढण्याची हिंमत होत नाही, अशी टीका करताना मोदी म्हणाले, “”पृथ्वीराज चव्हाण यांना शरद पवार यांनी येथून निवडणूक लढवण्याची गळ घातली. मात्र, येथील परिस्थिती आणि राजकीय अंदाज घेऊन त्यांनी पळ काढला. उलट पृथ्वीराज चव्हाण यांनीच शरद पवारांना येथून निवडणूक लढवण्याची विनंती केली. हे कोणतेही गुपित नाही तर स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुलाखतीत हे सांगितले होते. मात्र, शरद पवार हे राजकीय वाऱ्याची दिशा अचूक ओळखतात. ते पोहोचलेले राजकीय खेळाडू आहेत. राजकीय वारे कोणत्या दिशने वाहत आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनीही रणांगणातून पळ काढला.”
ऊस उत्पादकांना इथेनॉंलमुळे अधिक लाभ
मेहनती शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी नेतेगिरी, चमकोगिरी केली. महायुतीच्या सरकारने फक्त विकास कामे केली, असा दावा त्यांनी केला. “”पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये थेट अनुदान जमा होत आहे. ऊस उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यांना वेळेवर हप्ता व मदत मिळत आहे.
ती थेट त्यांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा होत आहे. साठ लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीवर सहा हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे, हे अनुदान थेट ऊस उत्पादकांना मिळाले आहे; परंतु आता फक्त साखर उत्पादनावर त्यांची प्रगती अवलंबून नाही तर इथेनॉल उत्पादनालाही प्राधान्य दिले आहे. येत्या काळात आधुनिक कारखान्यांद्वारे इथेनॉलचे उत्पादन वाढवून पेट्रोल व डिझेलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याची सुरुवात होणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे. छोटे शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यापारी यांना वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्तीवेतन मिळणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.