कराड – सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी, शेतकऱ्यांचे पुर्णपणे कर्ज माप करण्यासाठी शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून श्रीनिवास पाटील व बाळासाहेब पाटील यांना प्रचंड मताधिक्क्यांनी निवडून देऊन विजयी करावे, असे प्रतिपादन स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी केले.
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील गांधी मैदानात आघाडीचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष चांदगणी आतार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मिटकरी म्हणाले, शरदराव पवार साहेबांनी शेतकऱ्यांचे कर्ज माप केले. औद्योगिक विकास केला. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव दिला.ऐन पावसाळ्यात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. त्यावेळी पवारसाहेबांनी प्रत्यक्ष जावून पाहणी केली. विदर्भ, मराठवाडासह महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले.
यावेळी अमोल मिटकरी यांनी शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली. बाळासाहेब पाटील म्हणाले, विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता भूलथापांना बळी न पडता प्रामाणिकपणे आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून निष्ठेने काम करावे. सह्याद्री साखर कारखाना हा माझा एकट्याचा कारखाना नसून तो जनतेचाच आहे. जनताच मालक चालक आहे. विकासकामांच्या बाबतीत या भागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले. यापुढेही काम करत राहणार आहे.