नवी दिल्ली – सक्तवसुली संचलनालयाने उत्तर प्रदेशातील 7 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील विधानपरिषदेतील बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल आणि त्यांच्या कुटुंबीयांविरूद्धच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात तब्बल 1,097 कोटी रुपयांच्या या कारखान्यांवर ही कारवाई केली गेली. “ईडी’च्या लखनौ विभागीय कार्यालयाने मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये प्रतिबंधात्मक जप्तीची कारवाई केली, असे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे कारखाने इकबाल यांच्या मालकीचे असून कुशीनगर, बरेली, देवरिया, हरदोई आणि बाराबंकी जिल्ह्यात आहेत. हे कारखाने 2010-11 साली मोहम्मद इक्बाल आणि त्याच्या कुटुंबियांना निर्गुंतवणुकीद्वारे फक्त 60.28 कोटी रुपयांच्या किंमतीवर विकण्यात आले होते. त्या काळात उत्तर प्रदेशवर मुख्यमंत्री मायावती यांच्या अध्यक्षतेखाली बसपा सरकारचे राज्य होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे कारखाने इकबाल आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नम्रता मार्केटिंग प्रा. लि. आणि गिरीआशो कंपनी प्रा.लि. या बनावट कंपन्यांच्या नावावर खरेदी केल्या गेल्या असल्याचा ईडीचा आरोप आहे.