नगर -लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरतांना आढळून आलेली वाहने पोलिसांनी जप्त केली होती. ती आता तब्बल दोन महिन्यांनी सोडण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेली वाहने सोडण्याचा निर्णय मंगळवारी पोलीस प्रशासनाने घेतला. त्यानुसार वाहने सोडण्यास सुरवात झाली. कागदपत्रांची पडताळणी करून मालकांना ही वाहने पोलीस ठाण्यांमधून दिली जात आहेत. वाहने घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासून शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये वाहनधारकांनी गर्दी केली होती.
पोलिसांनी फिजिकल डिस्टन्ससिंगचा नियम पाळून ही वाहने परत केली. लॉकडाऊनच्या काळात वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. अनेक नागरिक मात्र विनाकारण वाहने घेऊन फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी ही वाहने जप्त करीत बहुतांशी वाहन चालकांविरोधात शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
नगर शहरात बाराशेपेक्षा जास्त तर संपूर्ण जिल्ह्यात साडेचार हजार वाहने लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी जप्त केली. यातील बहुतांशी वाहने गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस ठाण्यांमध्ये अडकून पडली होती. पोलिसांनी मंगळवारपासुन कागदपत्रांची पडताळणी करून वाहने परत देण्यास सुरुवात केली. ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही अथवा इतर कागदपत्राची पूर्तता नाही. अशा चालकांकडून दंड आकारण्यात येणार आहे.
ज्या वाहन चालकांविरोधात कलम 188 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्याबाबत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार आहे. त्यानंतर नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडून न्यायालयाच्या आदेशानुसार दंड आकारला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वाहन सोडण्यात येत असल्याने दुचाकी व चारचाकी वाहन मालकांनी आपली वाहने घेण्यासाठी पोलीस ठाण्यांसमोर गर्दी केली होती.