मुंबई – भाजपच्या अहंकारी सत्तेला देशातील जनता कंटाळली आहे. हुकूमशाही कारभार व अहंकार यामुळे जनतेमध्ये भाजपाविषयी मोठा संताप आहे. कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपचे नेते बिथरले आहेत. परंतु भाजपाच्या या टीकेचा पदयात्रेवर तसूभरही परिणाम होणार नसून ही पदयात्रा जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादासह काश्मीरपर्यंत मार्गक्रमण करत राहील, असा हल्लाबोल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त टिळक भवन येथे आदरांजलीचा कार्यक्रम झाला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो पदयात्रेवर पहिल्या दिवसापासूनच भाजपाचे नेते टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत पण ही टीका त्यांच्यावर उलटत आहे.
पदयात्रेतील लोकांचा सहभाग व प्रतिसाद प्रचंड आहे. लोकशाही, संविधान अबाधित ठेवणे व भारताची एकात्मता व विविधता कायम राखण्यासाठी निघालेल्या या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या पदयात्रेची दखल घ्यावी लागली म्हणूनच ते दिल्लीच्या मशिदीत जाऊन इमाम यांची भेट घेऊन आले.
देशाची अर्थव्यवस्था रसातळाली गेली आहे, रुपयाची घसरण थांबत नाही, भाजपा सरकार महागाईवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, बेरोजगारीची समस्या प्रचंड आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. या मुद्द्यांवर सत्ताधारी भाजपाकडे बोलण्यासारखे काहीच नाही, जनतेला तोंड दाखवायलाही त्यांना जागा नाही म्हणूनच ते पदयात्रेवर टीका करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
कॉंग्रेसचे “जय बळीराजा’ व “राम राम’ –
गांधी जयंतीच्या निमित्ताने आजपासून राज्यात “हॅलो’ ऐवजी “वंदे मातरम्’ म्हणावे असा शासन आदेश काढला आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले की, वंदे मातरम्ला आमचा विरोध नाही, पण आपला देश कृषीप्रधान आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. या अन्नादात्याबदद्ल कृतज्ञता व्यक्त करावी याच भावनेने “जय बळीराजा’ व “राम राम’ म्हणावे अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.