नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२१ – २०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटचे भाजपकडून कौतुक करण्यात येत आहे. या कौतुकात आता पतंजली समूहाचे प्रमुख आणि योगगुरू रामदेव बाबा यांची भर पडली आहे.
मोदी सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पावरून रामदेव बाबा यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. सध्याची स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत यापेक्षा चांगला अर्थसंकल्प बनवून दाखवला तर २०२४ मधील निवडणुकीत त्याच्या विजयासाठी आपलं सर्वस्व पणाला लावेल, अशी घोषणाच रामदेव बाबा यांनी केली आहे.
यावेळी रामदेव बाबांनी शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्यासाठी एक युक्ती सांगितले. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यांनी दुग्धउद्योग वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गाई आणि म्हशींचे पालन करावे, असं आवाहन रामदेव बाबांनी केले.
दरम्यान आपण दरवर्षी २ लाख कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करतो. याच खाद्य तेलाचे उत्पादन देशात सुरू केले तर शेतकऱ्यांना पाच वर्षात किमान १२ लाख कोटी मिळतील. सरकारने यासाठी नियोजन केले पाहिजे. तर शेतकऱ्यांनी सरकारसोबत काम करण्याची गरज असल्याचे रामदेव बाबा यांनी नमूद केले.