मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारचे राज्य असताना सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली होती. मात्र असे असताना देखील त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली नव्हती. असा आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला आहे. दरम्यान, आता या आरोपांना तत्कालीन सरकारचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले आहे.
बंडखोर आमदारांनी केलेल्या आरोपांवर वळसे पाटील यांनी उत्तर देताना,”एकनाथ शिंदेंना पुरेशी सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या मुलाने पत्र लिहून झेड प्लस सुरक्षा मागितली होती. पण एकनाथ शिंदेंकडून स्वतः कधीच सुरक्षेची मागणी करण्यात आली नव्हती. शिंदेंना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना नव्हत्या”, असे वळसे पाटलांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना वळसे पाटील यांनी म्हटले कि, सुरक्षा देण्याचा निर्णय तज्ञ समिती घेत असते. सार्वजनिक जीवनात काम करत असताना अशा धमक्या येत असतात. एकनाथ शिंदेंच्या चिरंजीवांनी पत्र दिल्यानंतर जेवढी सुरक्षा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना होती तेवढीच एकनाथ शिंदेंना होती. एकनाथ शिदे आणि शंभुराजे देसाई एकाच गटाचे आहेत म्हणून ते आरोप करत आहेत, असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.
तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात नोंद गुन्ह्यांचा तपास या सरकारने जरी केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिला तरी योग्य तपास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना या सरकारने स्थगिती दिलीय हे दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.