प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अग्निरोधक यंत्रांची संपली मुदत
पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत एखादी आगीची घटना घडल्यास तात्काळ उपाययोजना म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने अग्निरोधक यंत्रे बसविण्यात आली आहेत. मात्र यातील अनेक यंत्रांची कार्यक्षमता मुदत (व्हॅलिडिटी) संपलेली आहे. परंतु याकडे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, प्रशासकीय इमारतीची सुरक्षा रामभरोसे आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अग्निशमन विभागाकडून मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत विविध ठिकाणी अग्निशमन यंत्रे बसविलेली आहेत. यामध्ये महापालिकेच्या प्रत्येक विभागासमोर साधारणपणे दोन ते तीन अग्निशमन यंत्रे उपलब्ध आहेत. अशाप्रकारे संपूर्ण इमारतीमध्ये सुमारे 150 अग्निशमन यंत्रे ठेवलेली आहेत. मात्र, त्यांचा कार्यक्षमता कालावधी संपलेला आहे. याकडे अग्निशमन विभागाने लक्ष दिलेले नाही.
परिणामी, जोपर्यंत एखादी आग लागत नाही, तोपर्यंत त्या यंत्रांची दुरुस्ती होणार नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यासाठी महापालिकेच्या अग्निशमनविभागाकडून फायर ऑडिट करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. ज्या सोसायट्या अथवा कार्यालये फायर ऑडिट करून घेत नाही त्यांना दंड आकारला जातो. मात्र येथे महापालिकेची सुरक्षाच रामभरोसे असल्याचे बघायला मिळत आहे.
महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये दररोज अनेक नागरिकांचा राबता असतो. शहराच्या विविध भागामधून नागरिक कामानिमित्त महापालिकेत येत असतात. त्यामुळे येथील सुरक्षेविषयी काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र अग्निशमन विभागाने महापालिकेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
महापालिकेतील काही अग्निशमन यंत्राची मुदत संपली आहे. त्यासाठी आम्ही काम सुरू केले आहे. काही यंत्रे नव्याने बसविण्यात येणार आहेत. तसेच येत्या पंधरा दिवसांत आम्ही प्रशासकीय इमारतीतील सर्वच अग्निशमन यंत्रे बदलून घेणार आहोत.
– किरण गावडे, अग्निशमन अधिकारी, महापालिका.
तीन महिन्यांपूर्वीच कालबाह्य
महापालिकेतील अग्निशमन यंत्रात 6 किलो केमिकल्स पॉवर असते. त्यातील अनेक अग्निशमन यंत्राची 16 ऑगस्ट 2018 रोजी दुरुस्ती करून त्यांची मुदत 15 ऑगस्ट 2019 पर्यंत देण्यात आलेली होती. मात्र, गेली तीन महिने होऊनही अग्निशमन यंत्रे बदलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे कधी बदलण्यात येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.