एके-47 रायफलही ठरेल निष्प्रभ,
नवी दिल्ली – काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांविरुद्ध लढा देणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांना अभेद्य सुरक्षा कवच उपलब्ध करण्यात आले आहे. अतिरेक्यांकडून हल्ल्यासाठी वापरले जाणारे एके-47 रायफल व इतर शस्त्रेही या कवचापुढे निष्प्रभ ठरणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून, देशातच विकसित करण्यात आलेले 40 हजार बुलेटप्रूफ जॅकेट भारतीय सैनदलाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
हे स्वदेशी बनावटीचे जॅकेट अतिशय कठीण पोलादापासून तयार झाले आहे. अन्य शस्त्रांचाही त्याच्यावर परिणाम होणार नाही. या अभेद्य जॅकेटसोबतच जवानांसाठी विशेष हेल्मेटचीही निर्मिती करण्यात आली आहे. हे हेल्मेट एके-47 रायफलच्या गोळीबाराचा सामना करण्यास सक्षम आहे.
या बुलेटप्रूफ जॅकेटची निर्मिती करणाऱ्या एसएमपीपी कंपनीचे अधिकारी व सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल ओबेरॉय यांनी याविषयीची माहिती दिली आहे. भारतीय जवानांसाठी बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्याचे काम आमच्या कंपनीकडे सोपविण्यात आले आहेत. सध्या आम्ही 40 हजार जॅकेट तयार केले असून, उर्वरित जॅकेट निर्धारित वेळेत पूर्ण करू. आम्हाला पहिल्या वर्षात 36 हजार जॅकेट द्यायचे होते; मात्र आम्ही सैन्यदलाकडे 40 हजार जॅकेट सोपवले आहेत.
सरकारने आमच्या कंपनीला बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्यासाठी 2021 पर्यंतची मुदत दिली आहे, पण आम्ही सर्व जॅकेट 2020 च्या अखेरपर्यंत तयार करू. मागील वर्षी संरक्षण मंत्रालयाने या कंपनीला 1.80 लाख बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्याचे काम दिले आहे. या बुलेटप्रूफ जॅकेटसमोर एके-47 रायफलचा मारा देखील निष्प्रभ ठरणार आहे. आम्ही आपल्या जवानांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.