नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीने गैरसमज पसरवले
बंगळरू – कलम 370 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे आहे. संविधान सभेत कोणीही या कलमाच्या बाजुने नव्हते, कोणालाही वाटत नव्हते की असे काही व्हावे.याबाबत नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या नेत्यांकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला. खरेतर घटनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे की, कलम 370 हे अस्थायी आहे व ते बदलणार आहे, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले.
बंगळुरूमधील “एक देश एक संविधान’ या कार्यक्रमाप्रसंगी नड्डा बोलत होते. जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून पुन्हा एकदा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. नड्डा म्हणाले, जेव्हा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी शेख अब्दुल्ला यांना हे कलम पटवून देण्यास सांगितले होते. तेव्हा, तत्कालीन कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेख अब्दुल्ला यांना असे म्हटले होते की, आम्ही तुमच्या सीमा सुरक्षित कराव्यात, तुम्हाला अन्न आणि संपर्क यंत्रणा पुरवावी. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही भारतीयास नागरिकत्व दिलेले तुम्हाला नकोय, हे आम्हाला अमान्य आहे.
नड्डा म्हणाले की, कलम 370 मुळे माहितीचा अधिकार, बालकांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण देण्याचा कायदा, पंचायत राजसह 104 कायदे जे देशाच्या संसदेने निर्माण केले होते, ते जम्मू-काश्मीरमध्ये लागू होते नव्हते. अन्य राज्यांमधुन आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना तेथील सरकारमध्ये अन्य कोणत्याही नोकरीवर रूजू होण्याचे अधिकार नव्हते. अन्य राज्यात विवाह करणाऱ्या महिलांना वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार नव्हते. त्यामुळेच कलम 370 हटवणे आवश्यक होते, असे त्यांनी स्पष्ट केले.