नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर देशासह जगभरात याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, याचसंदर्भातील विविध याचिकांवरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. काश्मीरमधील निर्बंध आणि संबंधित परिस्थिती या सर्व याचिकांवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पाच न्यायाधीशांना संविधान पीठाकडे पाठवले. मंगळवारपासून या सर्व याचिकांवर हे खंडपीठ सुनावणी घेणार आहे.
मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने काश्मीरमध्ये तथाकथित बंदी घालण्याची, पत्रकारांच्या हालचालीवरील बंदी आणि खोऱ्यातील मुलांच्या अटकेसाठीच्या सर्व याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हा विषय संदर्भित केला. खंडपीठात न्यायमूर्ती एस.के. कौल, न्यायमूर्ती आर.सुभाष रेड्डी, न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश आहे. या प्रकरणी केंद्र सरकारकडून उत्तर दाखल केले जाणार असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली.
या याचिकांमध्ये इनाक्षी गांगुली, मोहम्मद तारीगामी, सीताराम येचुरी, गुलाम नबी आझाद, अनुराधा भसीन यांच्या याचिकांचा समावेश आहे. कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यासाठी शनिवारी कोर्टाने या पाच सदस्यांच्या संविधान पीठाची स्थापना केली होती त्यानुसार आजपासून या याचिकांवर सुनावणी होणार आहे.