ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत
शाळा, महाविद्यालय आणि इंटरनेट सेवा बंद
श्रीनगर: अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले अयल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून जमावबंदीसाठीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत डीजीपी, मुख्य सचिव, आयजी यांच्यासह इतर अधिकारी हजर होते. जम्मू काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारची सभा, रॅली किंवा जिथे जमाव एकत्र येईल अशा सगळ्या कृतींवर बंदी घालण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेला तणाव कायम आहे. त्याचमुळे या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. जम्मू आणि श्रीनगरमध्ये हे कलम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. तसेच जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट आणि लॅंडलाईन सेवाही बंद करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना सॅटेलाईट फोन देण्यात आले आहेत. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर टीका करत मला यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांची कमतरता भासत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान कलम 144 लागू झाल्यानंतर शाळा आणि महाविद्यालयंही बंद ठेवण्यात आली आहेत. श्रीनगरच्या एनआयटीचे शेकडो विद्यार्थी त्यांच्या घरी गेले आहेत. त्यांना घरी पोहचण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून शक्य ते सहकार्य केले जाते आहे. काश्मीरमधील अमरनाथचे यात्रेकरु आणि इतर पर्यटकांना मागे धाडल्यानंतर आता काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काश्मीरमधील सर्व सरकारी शाळा, महाविद्यालयं आणि इतर संस्थांना सोमवारपासून सुट्टी देण्यात आली आहे. जम्मूमध्ये आज सकाळी सहा वाजल्यापासून कलम लागू करण्यात आलं आहे. काश्मीरमधल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांनी सगळ्याच प्रादेशिक पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीही हजर होत्या. काश्मीरमध्ये घडणाऱ्या घडामोडींबाबत देशात संभ्रमाचं वातावरण आहे. कलम 35 अ बाबतही महत्त्वाचा निर्णय या आठवड्यात घेतला जाईल अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.