नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या खोटेपणाच्या संबंधात आणखी एक टिकास्त्र सोडणारे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारकडे धादांत खोटे बोलणारे आणि फालतू घोषणा करणारे एक गुप्त खाते असून तेच केंद्र सरकारचे सर्वात यशस्वी खाते आहे अशी उपरोधिक टिपण्णी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत लसीची घोषणा करताना जे भाषण केले होते त्यात त्यांनी देशातल्या आत्तापर्यंतच्या लसीकरणाच्या संबंधात कशी खोटी माहिती दिली गेली आहे याचा तपशील कॉंग्रेसने सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर आणला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज हे ट्विट करून मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
या देशातील ज्या लोकांकडे इंटरनेट सुविधा नाही त्यांनाही करोना विरोधातील लस मिळाली पाहिजे तो त्यांचाही अधिकार आहे असेही राहुल गांधी यांनी दुसऱ्या एका ट्विटर संदेशात म्हटले आहे. ज्यांना सरकारी ऍपवरून नोंदणी करता येत नाहीं त्यांच्यासाठी आज लसीकरणाची कोणतीच सोय उपलब्ध नाही त्यांच्यासाठी त्यांनी हे ट्विट केले आहे.