संगमनेरमधून एकमेव प्रदेशाध्यक्षांचा अर्ज ना. विखेंच्या विरोधात तांबेंचा अर्ज
नगर – आधीच कशीबशी तग धरून असलेल्या कॉंग्रेसमधून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुरती खिळखिळी झालेल्या कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर इच्छुकांच्या आज मुलाखती घेतल्या. संगमनेर, श्रीगोंदा वगळता अन्य विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी एकच गर्दी केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षाही कॉंग्रेसच्या मुलाखतीला चांगला प्रतिसाद मिळाला.
तब्बल 48 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. कोपरगाव मतदारसंघातून एकही इच्छुक नसल्याचे समोर आले असून विखे यांच्या विरोधात लढण्यासाठी अनेक इच्छुक दिसून आले असले तरी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देखील विखेंच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवारी मागितली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी झाली असली तरी मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या मुलाखतीचा सोपस्कार दोन्ही पक्षांनी पूर्ण केला आहे. राष्ट्रवादीपाठोपाठ आज कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पक्षनिरिक्षक माजी आमदार मोहन जोशी, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळुके यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
शिर्डी, श्रीरामपूर, नगर शहर या तिन्ही मतदारसंघातून मोठ्या संख्येने इच्छुक दिसून आले. शिर्डीमधून 10 तर श्रीरामपूरमधून 8 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. नगर शहरातून 6, नेवासे, राहुरीमधून प्रत्येकी 4 इच्छुक आहेत. सकाळी 11 वाजता या मुलाखती सुरू होणार होत्या. परंतु दुपारी 12 वाजेपर्यंत पक्षनिरिक्षकांसह इच्छुक देखील शहर कार्यालयात आले नव्हते. सुरवातीला दक्षिण मतदारसंघातील सहा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. अकोले मतदारसंघातून भाजपच्या नेत्यांकडून उमेदवारी मागण्यात आली आहे. सन 2009 मध्ये आघाडीच्या जागावाटपात कॉंग्रेसकडे संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड हे पाच मतदारसंघ होते. त्यात आता श्रीगोंदा, नगर शहर, अकोले या तीन मतदारसंघाची मागणी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षनिरिक्षकांकडे केली आहे. हे मतदारसंघ राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसकडे घेण्यात यावेत असा आग्रह आहे.
कॉंग्रेसकडे पहिल्या फळीतील नेत्यांची संख्या संगमनेर, श्रीगोंदा वगळता अन्य मतदारसंघात कमी असल्याने आता दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून सामन्य कार्यकर्त्यांनी आता पक्षाने बळ द्यावे, अशी मागणी करीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पक्षाचे तालुकाध्यक्ष आदींचा त्या समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उमेदवारीची मागणी संगमनेरमधील शिष्टमंडळाने केली. त्यावेळी आ.डॉ. तांबे, शहराध्यक्ष विश्वास मुतर्डक आदींचा समावेश होता.