नवी दिल्ली – गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरल श्रेणीच्या अधिकाऱ्यांमध्ये आज चर्चेची दुसरी फेरी झाली. पूर्व लडाखमधील चुशूल भागात चीनच्या हद्दीतील मोल्दो इथे ही चर्चा सुरू होती. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये 6 जूनला झालेल्या चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये निश्चित झालेल्या कराराच्या अंमलबजावणी बरोबरच विश्वास निर्माण करण्याच्या उपाययोजनाही यावेळी निश्चित केले जाणे अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले.
चर्चेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व 14 कोर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग हे करीत आहेत. तर चीनच्या बाजूने तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्टचे कमांडर हे प्रतिनिधींचे नेतृत्व करत आहेत. गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर ही चर्चा होत आहे. गेल्या 45 वर्षात दोन्ही सैनिकांमध्ये झालेला हा सर्वात गंभीर संघर्ष होता.
चिनी सैनिकांनी ताबा रेषेवर भारतीय हद्दीमध्ये उभारलेल्या चौकीला भारतीय जवानांनी विरोध केल्यावर चिनी सैनिकांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडकी, विटा आणि दगडांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. बुधवारी चीनचे पंतप्रधान वांग यी यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हा पीपल्स लिबरेशन आर्मीचा चिथावणीखोर हल्ला असल्याचे म्हटले होते.