जयपूर – कोरोनाची दुसरी लाट धोकादायक ठरत आहे. केवळ शहरांमध्येच नव्हे, तर कोरोनामुळे आता खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवीत हानी होत आहे. ग्रामीण भागातील लोकांचा निष्काळजीपणा जीवावर बेतत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात करोना नियमांचे पालन होत नसल्याने करोना संसर्ग बाधितांसह मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशातच राजस्थानमधील जालोर येथे एका विवाहानंतर दुसऱ्या दिवशी नवरदेव करोना पाॅझिटिव्ह झाला आणि उपचारादरम्यान नवव्या दिवशी नवरदेवाचा करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
गंभीर परिस्थिती असतानाही ग्रामीण भागात विवाहामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत. त्याचा परिणाम संसर्ग वाढत आहे. सोशल डिस्टंसिंग तर दूरची गोष्ट साधा मास्कही लावला जात नसल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. यामुळेच एक नवविवाहित दाम्पत्य नवीन जीवनाची सुरुवात करत असतानाच पत्नी विधवा झाली. करोनामुळे विवाहाच्या काही तासानंतर नवरदेवाला रुग्णालयात दाखल करावे लागले. तब्येत बिघडल्यामुळे नवरदेवाला पालनपुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान नवव्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जालोरमधील रायपुरिया येथील रहिवाशी इश्वर सिंह देवडा यांची मुलगी कृष्णा कंवर चा विवाह 30 एप्रिल 2021 रोजी जालोर येथीलच रहिवाशी शैतान सिंह सोबत झाला होता. करोना काळात निष्काळजीपणा नवरदेवाला महागात पडला. करोना काळात मास्क न घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन न केल्याने नवरदेवाला आपला जीव गमवावा लागला.
शैतान सिंहचे 30 एप्रिलला लग्न पार पडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 मे रोजी त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोविड चाचणी पाॅझिटिव्ह आली. उपचार सुरु होते मात्र, तब्येत अधिकच बिघडत चालली होती. अखेर 9 मे रोजी रविवारी शैतान सिंहचा करोनामुळे मृत्यू झाला.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अशातच राजस्थान सरकारने लोकांना विवाहाचे आयोजन करण्यास मनाई केली आहे. तरी देखील विवाहाचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमत आहेत. अशावेळी मास्क, सोशल डिस्टंसिंगचेही पालन होत नसल्याचे दिसते. त्याचा परिणाम संसर्ग वाढत जाऊन लोक मोठ्या प्रमाणात संक्रमित होत आहे. अजूनही वेळ असून लोकांनी मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन केले पाहिजे. अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. तरच करोनाची साखळी तुटू शकते. अन्यथा करोनामुळे मोठी जीवीत हानी होण्यापासून कोणीही रोकू शकत नाही.