नुकतेच बॅंकेच्या व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात आले आहेत. नितीन चुग यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल स्वतंत्र संचालक म्हणून आले आहेत. उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेला बाजारात आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर ) आणण्यास सिक्युरिटीज अँड एक्सेंज बोर्डाने (सेबी) परवानगी दिली आहे. या आपीओद्वारे बाजारातून 1,200 कोटी रुपये उभारण्याचे बॅंकेचे उद्दिष्ट आहे. बॅंकेने दुसऱ्या तिमाहीतील कामगिरीदेखील नुकतीच जाहीर केली आहे.
त्यानुसार या तिमाहीत बॅंकेला 93 कोटी रुपयांचा फायदा झालेला आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यावेळी नफ्यात तब्बल 111 टक्क्यांनी वाढ झाली आहे. उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस ही बॅंकेची मूळ (पेरेन्ट) कंपनी असून मायक्रो फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीने 2017 मध्ये छोट्या रकमेची कर्जे देणारी बॅंक सुरु केली. आज या बॅंकेच्या देशातील 20 राज्यात 180 शाखा आहेत.
भारताबाबत नाणेनिधी आशावादी – कंपनी करातील कपात आणि अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या धोरणांमुळे पुढील आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक वाढीचा वेग सात टक्क्यांच्या आसपास राहील असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केले आहे. चालू वर्षात भारताच्या आर्थिक वाढीचा वेग 6.1 टक्के राहील असे नाणेनिधीचे गणित होते.
2020 या आर्थिक वर्षात त्यात वाढ करून हा वेग सात टक्क्यांवर जाईल असे नाणेनिधीच्या आशिया-प्रशांत विभागाचे उपसंचालक जोनाथन ऑस्ट्री यांनी म्हटले आहे. गेल्या काही तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था काही मंदावल्याचे दिसत असून त्याचे नाणेनिधीसह अनेकांना आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यासाठी एक कारण सांगता येणार नाही तर कॉर्पोरेट आणि नियमनाच्या पातळीवरील अनिश्चिततेसह, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवरील ताण अशी वेगवेगळी कारणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नव्या धाडसी सुधारणांची गरज – येत्या तीन-चार वर्षात भारताने आर्थिक क्षेत्रात नव्याने अधिक धाडसी सुधारणा केल्या तरच सहजपणे व्यवसाय करण्याचे (इज ऑफ डुईंग बिझनेस) वातावरण असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश पहिल्या 50 देशांमध्ये होऊ शकेल असे मत जागतिक बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. कदाचित पहिल्या 40 मध्येही भारताला स्थान मिळू शकेल असे जागतिक बॅंकेचे संचालक (अर्थव्यवस्था विकास) सिमॉन डिजान्कॉव यांनी म्हटले आहे. सहजपणे व्यवसाय करण्याचे वातावरण असणाऱ्या देशांची मानांकन यादी जागतिक बॅंकेने जाहीर केली आहे.
त्यामध्ये भारताने 77 व्या क्रमांकावरून 63 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कर सुधारणा, दिवाळखोरी आणि बॅंकिंग संहिता, कंपन्यांसंदर्भातील वादांचे लवकर निराकरण यावर भारताची पुढील प्रगती अवलंबून असेल असे ते म्हणाले. याबाबत लॅटिन अमेरिकेतील आणि युरोपातील अनेक देशांकडून भारताला तीव्र स्पर्धा करावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे येत्या चार वर्षांत भारताला नवे प्राधान्यक्रम निश्चित करावे लागतील आणि ते सध्या अस्तित्वात नसल्याचे आपणास वाटते असे त्यांनी म्हटले आहे.
आयटीसीची दमदार कामगिरी – कोलकत्यात मुख्यालय असणाऱ्या आयटीसी या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने सप्टेंबर 2019 मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये चांगली कामगिरी नोंदवलेली आहे. या कालावधीत कंपनीच्या नफ्यात विक्रमी 36.2 टक्क्यांनी वाढ होऊन तो 4023.1 कोटी रुपयांवर पोचला आहे.
सिगारेट, दैनंदिन वापराच्या वस्तू (एफएमसीजी) आणि हॉटेलच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीच्या एकूण उलाढालीत या तिमाहीत 5.9 टक्क्यांनी वाढ होऊन ती 11,750.16 कोटी रुपयांवर पोचली आहे. सिगारेट व्यतिरिक्त एफएमसीजी आणि हॉटेल व्यवसायाचा यात मोठा वाटा आहे. विश्लेषकांच्या मते कंपनीच्या सिगारेटच्या विक्रीतही या तिमाहीत 3 ते 4 टक्के वाढ झाली आहे.
कंपनीने सिगारेट व्यतिरिक्तच्या एफएमसीजीच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये पॅकेज्ड फूड, स्टेशनरी, अगरबत्ती, काडेपेट्या, वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तूंचा समावेश आहे. त्यांच्या उलाढालीत चार टक्क्यांनी वाढ होऊन ती 3288.31 कोटी रुपयांवर पोचली आहे. कंपनीचा आटा, बटाटा चिप्स, क्रीम बिस्कीटे, हॅंडवॉश, बॉडीवॉश आणि वह्यांच्या विक्रीचा त्यात मोठा वाटा आहे. (आयटीसीचा शुक्रवारचा बंद भाव – 247.70 रुपये)