सातारा (प्रतिनिधी) – गेल्या आठवड्यात कराड व सातारा शहरात झालेल्या खुनांच्या घटनांमध्ये सर्व संशयित पकडण्यात आले आहेत; परंतु सर्वसामान्यांना भयमुक्त करण्यासाठी गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या राजकारण्यांचा शोध घेण्याचा आदेश पोलिसांना दिल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सरकार, पोलीस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आ. महेश शिंदे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव उपस्थित होते. जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था ढासळत चालली आहे. कराड व सातारा या शहरांमध्ये गेल्या आठवड्यात चार खून झाले आहेत. जिल्ह्यात अनेक गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे.
याबद्दल तुमची भूमिका काय, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केला. त्यावर देसाई म्हणाले, जिल्ह्यातील खुनाच्या घटनांमागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. कोणी राजकारणी गुन्हेगारांना पाठबळ देत असेल तर ते घातक आहे. पोलिसांनी अशा राजकारण्यांचा शोध घ्यावा. घटना घडल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा गुन्हे घडूच नयेत यासाठी जिल्ह्यात पोलिसांची गस्त वाढवण्याचा आदेश देण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडून जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर त्यांना सूचना केल्या जातील. राजकीय घडामोडींबाबत ते म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर न लढता स्थानिक पातळीवर लढल्या जातात; परंतु महाविकास आघाडी अथवा पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडी म्हणून ग्रामपंचायत निवडणुका लढण्याचे आदेश राज्य पातळीवरून आले तर त्यानुसार काम करावे लागेल.
बानुगडे-पाटील गालातल्या गालात हसले
तुम्ही गेले काही दिवस शांत आहात. विधान परिषदेची आमदारकी लांबल्यामुळे तर नाही ना? असा प्रश्न पत्रकारांनी नितीन बानुगडे-पाटील यांना विचारला. त्यांनी नेहमीचे जॅकेट घातले नव्हते. त्यामुळे विधान परिषदेची आमदारकी आणि जॅकेट यांचा संबंध आहे का, असे विचारता, गालातल्या गालात हसून त्यांनी उत्तर देणे टाळले.