पुणे – राज्य शासनाच्या वतीने शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने “एक गाव-एक बालरक्षक’ अशी मोहीम राबविण्यात आली. यात अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक 4 हजार 908, तर सर्वात कमी मुंबईतून केवळ 60 एवढी बालरक्षकांची नोंदणी झाली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने बालरक्षकांची नोंदणी करण्याबाबातच्या सूचना राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी बालरक्षकांची नोंदणी करून त्याचा अहवालही सादर केला आहे.
राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळांची संख्या ही 31 हजार 940 आहे. 23 हजार 136 गावे आहेत. यात एकूण 26 हजार 6 एवढी बालरक्षकांची नोंदणी झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबे स्थलांतरित होत आहेत. अनेक शाळा बंदच असल्याने बालके शाळाबाह्य होण्याचा अधिक धोका निर्माण झाला आहे.
शाळाबाह्य, स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी बालरक्षकांवर आहे. बालरक्षकांनी बालकांना शाळेत दाखल करून त्यांचे ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले पाहिजे. ऊसतोड, वीटभट्टी, दगडखाण कामगारांची मुले शाळेत दाखल करून घ्यावी लागणार
जिल्हानिहाय बालरक्षकांची नोंदणी
मुंबई – 60, रायगड- 1818, ठाणे -1328, पालघर – 3297, पुणे-2189, सोलापूर – 2873, अहमदनगर – 4908, नाशिक – 3533 , धुळे -1380, जळगाव-1782 , नंदूरबार- 395 , कोल्हापूर -1976 , सातारा-2745 , सांगली -1688 , सिंधुदुर्ग-1174 , औरंगाबाद – 423, जालना -1361, बीड -2491 , परभणी-1363, हिंगोली -855 , अमरावती -1487 , बुलढाणा-1535 , अकोला -931 , वाशिम-921, यवतमाळ -2291, नागपूर -1818, भंडारा -732, गोंदिया -1026, वर्धा -115 , चंद्रपूर -1985 , गडचिरोली -1773 , लातूर -1935, उस्मानाबाद-1100, नांदेड – 371.