जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेण्याची अपेक्षा
सातारा – शिवसागर जलाशयात होणाऱ्या बोटिंगचे नियमन कोणी करायचे त्या यंत्रणेचा शोध सुरू झाला आहे. नौकानयन परिवहन व्यवस्था हा विषय कोणाच्या कार्यक्षेत्रात आहे याचा उलगडा कोणत्याच शासकीय यंत्रणेला होईनासा झाल्याने शिवसागर जलाशयातील बोटिंग विषयाची कोंडी झाली आहे. जलसंपदा विभाग, वन विभाग, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि जिल्हा प्रशासनासह बोट चालकांची एक व्यापक बैठक तातडीने घेण्याची मागणी होऊ लागली आहे.
निकषांच्या पूर्ततेची आवश्यकता
बामणोली ते वासोटा हे अंतर दीड तासांचे आहे. वनविभागाचे परवानगी केंद्र जलाशयाच्या पलीकडे गेल्याने बोटचालकांच्या अडचणी वाढल्या आणि बोटिंगची परवानगीच नाकारली गेल्याने गेल्या बारा दिवसांपासून बोटी किनाऱ्यावरच तळ ठोकून आहेत.
नौकानयनाच्या पर्यावरणीय मानकानुसार बोटीची नोंदणी, मजबुती, परिवहन क्षमता, संबधित यंत्रणेचे परवानगीपत्र, पाण्याचे प्रदूषण टाळणारे बोटीचे रंग, लाईफ जॅकेटस व रिंग्ज, इंजिन परिचालनाची कार्यक्षमता आणि परवाना प्राप्त व प्रशिक्षित नौका चालक या सर्व निकषांची बामणोली येथील बोट क्लबकडून पूर्तता होत नाही. या पूर्तता त्यांनी कराव्यात आणि इतर अनुषंगिक सुविधांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची यंत्रणा मदत करेल, असे स्पष्ट आश्वासन प्रकल्प संचालिका विनिता व्यास यांनी “प्रभात’ शी बोलताना दिले.