पिंपरी – राज्यात चांगल्या पद्धतीने काम करत असलेले महाविकास आघाडी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून पाडले. महाविकास आघाडी सरकारने तीनचा केलेला प्रभाग रद्द करून आता चारचा प्रभाग केला जात आहे. लोकसंख्येनुसार वाढविलेली सदस्य संख्या कमी केली. निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. तुम्ही दोघे पदे घेता, वाढविलेली सदस्य संख्या नाकारता, हे लोकशाहीला, राज्यघटनेला अनुसरून नाही. ईडीचा वापर करून लोकशाहीचा मुडदा पाडला जात आहे. राज्यातील जनतेकडे लक्ष देण्यासाठी सरकारमध्ये कोणी नाही, हे दोन टिकोजीरावांचे सरकार असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा या मेळाव्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पवार बोलत होते. पवार म्हणाले, सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. त्यातून लोकशाहीचा खून सुरू आहे. शिंदे- फडणवीस हे दोघे मिस्टर इंडिया नाहीत.
दोघेच राज्याचा कारभार हाकत असून उपमुख्यमंत्री फडणवीस हे देखील बिनखात्याचे मंत्री आहेत. स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना कोणत्याच जिल्ह्याला पालकमंत्री नसणे ही बाब दुर्देवी आहे. पांडुरंग चरणी प्रार्थना करू की 15 ऑगस्टपर्यंत मंत्रीमंडळ अस्तित्वात येईल. राज्यात सध्या जे चाललं, ते परवडणार नाही. ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी जनता त्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.
राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्या भागातील शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. मात्र, राज्यात दोघांचे सरकार आहे. याचा काही उपयोगच नाही. राज्यकारभार, प्रशासन ठप्प झाले आहे. एक महिना होऊन गेला तरी मंत्रीमंडळ अस्तित्वात येत नाही. न्यायालयाची अडचण आहे की दिल्लीची अडचण आहे, ते जनतेला सांगा.
तुम्ही दिल्लीला किती वेळा जाता, हे जनतेने मोजावे का? असा टोलाही पवार यांनी लगावला. या दोघांनी चुकीच्या पद्धतीने काम चालविले असून ज्या अधिकाऱ्यांना निलंबित केले त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले आहे. शिक्षक भरती घोटाळ्यातील अधिकाऱ्यांनाही कामावर घेण्याचा प्रकार अत्यंत दुर्देवी असून ज्यांनी अनेकांचे उज्ज्वल भविष्य अडचणीत आणले, ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावेत आहेत अशांना पुन्हा सेवेत घेऊन काय साध्य केले जाणार आहे? असा प्रश्नही पवारांनी यावेळी उपस्थित केला.
जनता महागाईने होरपळत असताना इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. डिझेल, पेट्रोलचे दर समान केले. आता तर पेट्रोल आणि सीएनजीचेही दर समान केल्यामुळे महागाई सातत्याने वाढत आहे. फक्त बनवा-बनवी सुरू आहे. रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर पुन्हा वाढविले आहेत. त्यामुळे महागाई आणखीच वाढणार आहे.
गाजर दाखविलेले निम्मे माघारी फिरतील
वेगळ्याच कारणाने शिंदे गटात सामील झालेले आता आमच्यावर टीका करत आहेत. गेल्या अडीच वर्षांत यातील एकानेही तोंड उघडले नव्हते. गतवेळी शिवसेना भाजपची युती असताना अनेकजण राजीनामे घेऊन फिरत होते. मात्र गेल्या अडीच वर्षांत एकजणही राजीनामा घेऊन फिरला नाही. नाचता येईना आंगण वाकडे असा काहीसा प्रकार त्यांचा झाला आहे. गेलेल्या सगळ्यांनाच मंत्रीपदाचे गाजर दाखविल्याने मंत्रीमंडळ विस्तार रखडला असावा अशी शंका आहे. मंत्रीमंडळात सामावून न घेतल्यास गेलेल्यांपैकी निम्मे माघारी फिरण्याच्या भितीनेच मंत्रीमंडळाचा विस्तार रखडल्याची टीकाही पवार यांनी यावेळी केली.
तर तुम्ही दोघे घरी बसा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपल्या आहेत. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदांवर प्रशासक कामकाज पाहत आहे. आता तर तीनचा प्रभाग चारचा करायला निघाले आहेत. लोकसंख्येनुसार वाढविलेली सदस्य संख्या कमी केली. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा हक्क नाकारला गेला आहे. नगरपालिकांमध्ये जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ नगराध्यक्षच का? यापुढे महापौर, मुख्यमंत्री, पंतप्रधानही जनतेतून निवडा. मंत्रीमंडळ होत नसल्याने आता तर मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिले आहेत. त्यामुळे सर्वत्रच प्रशासक कारभार पाहणार असेल तर मुख्य सचिवांना तुमचे अधिकार द्या आणि तुम्ही दोघे घरी बसा, असा टोला पवार यांनी लगावला.