-डॉ. मेघश्री दळवी
आज जगभरात एका विषाणूचा सामना आपण करत आहोत आणि त्यानिमित्ताने आपल्या आयुष्यातलं जीवाणू-विषाणूंचं स्थान पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. बरेच जीवाणू आपल्याला हानिकारक असले, तरी काही जीवाणू मात्र आपले मित्र आहेत. त्यात आहेत रोपांच्या वाढीसाठी मदत करणारे मातीमधले जीवाणू आणि आपल्या शरीरातले, विशेषत: पचनसंस्थेतले जीवाणू.
पण गेल्या काही दशकांमध्ये आपला प्रतिजैविकांचा वापर वाढला आहे, सोबत अन्नावर प्रचंड प्रमाणात प्रक्रिया करून अन्न साठवण्याकडे कल होत आहे. याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरातल्या या मित्र जीवाणूंच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. उद्या हे अतिमहत्त्वाचे जीवाणू पूर्णपणे नष्ट झाले तर?
असाच विचार याआधी बी-बियाणांसाठी झाला आहे. वनस्पतींमधलं जीववैविध्य कमी होत चाललं आहे. उद्या एखाद्या विशिष्ट पिकांची जात रोगांमुळे पूर्ण नष्ट झाली तर तिची पुन्हा लागवड कशी करायची? या हेतूने बी-बियाणांचं एक कोठार नॉर्वेमधल्या स्वालबार्डमध्ये उभं राहिलं आहे. आज पंधरा लाखांहून जास्त बियाणं इथे साठवलेली आहेत, आणि ती शंभर ते हजार वर्षांपर्यंत टिकतील अशी अपेक्षा आहे.
त्याच धर्तीवर मित्र जीवाणूंसाठी एखादं कोठार उभं करावं, असा प्रस्ताव आता वैज्ञानिकांनी मांडला आहे.
लस किंवा औषधावर संशोधन करताना शत्रू जीवाणूंच्या साठ्यांची गरज भासते. पण मित्र जीवाणूंना गृहीत धरून चालणार नाही. एखादा महत्त्वाचा जीवाणू आपण संपवून टाकला तर माणसात भयंकर आजार बळावू लागतील. पचनसंस्थेचे विकार, अतिलठ्ठपणा, अतिसार असे रोग आज आटोक्यात आणण्यामागे मित्र जीवाणूंची मोलाची भूमिका असते. त्यांचं जतन केलं नाही तर उद्या अख्ख्या मानवजातीचा विनाश ओढवू शकतो. या उद्देशाने हा प्रस्ताव आला आहे.
व्हेनेझुएला, बोलिव्हिया, पेरू, ब्राझील अशा देशांमध्ये जीवाणूंचा अभ्यास करणाऱ्या एका गटाने दोन गंभीर निष्कर्ष जगापुढे आणले आहेत. एक म्हणजे शहरीकरण झपाट्याने होत असताना आपल्या शरीरातले काही मित्र जीवाणू टिकाव धरत नाहीत. त्यामुळे आतड्यांमधली जीवाणूंची विविधताही झपाट्याने घसरते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते आणि रोगांचा फैलाव वेगाने होऊ लागतो.
दुसरा निष्कर्ष म्हणजे आज अनेक देशांमध्ये राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे तिथे स्थानिक नागरिकांचे घेतलेले जैविक नमुने किती सुरक्षित राहतील आणि कधी उद्ध्वस्त होऊन जातील याची शाश्वती नाही. तसं झालं तर एका अमूल्य खजिन्याला हरवून बसू. त्यामुळे स्वालबार्ड बीजकोठाराप्रमाणे एखाद्या सुरक्षित जागी माणसाच्या सर्व मित्र जीवाणूंचं कोठार उभं राहावं, असा प्रस्ताव या गटाने मांडला आहे. त्याला इतर अनेक शास्त्रज्ञांनीही पाठिंबा दिला आहे. स्वित्झर्लंडमधील दोन संस्था याबाबत पुढाकार घ्यायला तयार आहेत. त्यावर लवकरच निर्णय होईल आणि एका अत्यावश्यक प्रकल्पाला आरंभ होईल, अशी आशा आहे.